मुंबईत एकाच वेळी महायुती व इंडिया आघाडीची बैठक असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या निमित्ताने विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईतील बैठकीसाठी हजर असताना दुसरीकडे भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट यांच्या महायुतीच्या बैठकीलाही तिन्ही पक्षांमधल्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही बाजूला एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना नेतेमंडळी दिसून आली. महायुतीच्या बैठकीत भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‘इंडिया’चा उल्लेख पहिल्यांदाच ‘इंडी’ असा करत खोचक टोलेबाजी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महायुतीची अवस्था इंडी आघाडी (I.N.D.I.A.) सारखी नसल्याची टीका केली. “मुख्यमंत्री, मी, अजित पवार आमच्यात पूर्ण संवाद आहे. एका विचाराने आम्ही चाललो आहोत. सगळे निर्णय एकत्र घेत आहोत. आमच्यात १०० टक्के समन्वय आहे. आमची परिस्थिती इंडी आघाडीसारखी नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ममता बॅनर्जींचा ‘तो’ प्रसंग!

दरम्यान, इंडिया आघाडीवर टीका करण्यासाठी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ग्रँड हयात हॉटेलमधील बैठकीदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. “या व्यासपीठावर आलेल्या कुणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे? समोरच्या दिग्गजांना कुणालाही प्रश्न पडला नाही की आम्ही खाली का आहोत? पण इंडी आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आल्या, तेव्हा सगळे खुर्च्यांवर बसले होते. त्या नमस्कार करत एकेकासमोरून जात होत्या. कुणीच खुर्ची दिली नाही. शेवटी परत आल्या आणि नमस्कार करून निघून गेल्या”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवारांवरही खोचक टीका

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनाही टोला लगावला. “शरद पवारांनी तेव्हा ममता बॅनर्जींना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांनी अजित पवारांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ते थांबले का? आता सगळ्यांना नेमकी दिशा समजलीये की कुठल्या दिशेनं जायचंय. त्यामुळे ममता दीदी तिथून निघून गेल्या”, असं फडणवीस म्हणाले.

“इंडी आघाडीला माझा एकच प्रश्न आहे…”

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी इंडियाच्या घटक पक्षांना प्रश्न केला. “त्यांना माझा एकच प्रश्न आहे. तुमचा पंतप्रधानपदाचा एक उमेदवार कोण आहे ते सांगा. आमचा एकच उमेदवार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पण इंडी आघाडीनं सांगावं, त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नेमका कोण आहे. आत्तापर्यंत पाच पक्षांनी दावा ठोकला. सगळ्यात मजेदार असं आहे की दोन दिवस यांनी बैठक केली आणि दोन दिवसांच्या बैठकीनंतर इंडी आघाडीनं जे प्रसिद्धीपत्रक तयार केलंय, त्यात सांगितलं की आम्ही शक्यतो एकत्र लढू”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

‘अशी’ असेल ‘इंडिया’ची पुढची रणनीति, मुंबईतल्या बैठकीत मांडले तीन ठराव; मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आजच इंडी आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे. जे लोक पत्रकातही म्हणू शकत नाहीत की आम्ही १०० टक्के एकत्र लढणार आहोत ते एकत्र काय लढणार? कालपासून लोगोची चर्चा होती. आम्हालाही वाटलं आता हे काय आणतायत. वडेट्टीवार बिचारे चकरा मारत होते की कुठेतरी फुटेज मिळेल. त्यांना एक जबाबदारी दिली की मीडियात जाऊन सांगा की लोगो रिलीज होणार नाही”, असंही फडणवीस म्हणाले.