Devendra Fadnavis On Cabinet : राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत आले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काही भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना समावून घेण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणात टीका केली होता. दरम्यान आज एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात फडणवीसांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतल्या आहेत. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्या भ्रष्टाचाराबाद्दल तुम्ही वैयक्तिक भूमिका घेतली होती आणि आज ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. जसे की अजित पवार, छगन भुजबळ हे कसे झाले? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
उद्धव ठाकरेंनी धोका दिला
“हे राजकारणाचं वास्तव आहे. या मुद्द्यांपासून तोंड फिरवून तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. जर २०१९ मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आणि माझ्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात असल्याचे आणि मी मुख्यमंत्री बनेल हे पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, शिवसेनेने आम्हाला धोका दिला. त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाहीत. ही अशी जागा आहे जेथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावे लागते. तुम्ही मेलात तर तुम्हाला कोणी विचारणारे नसेल. त्यामुळे आम्ही वाट शोधली. जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भटकले. त्यानंतर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो, त्यांना घेऊन पुढे गेलो,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
तडजोड ही फक्त जिवंत राहण्यासाठी
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “मी नेहमी माझ्या राजकारणात नेहमी हे तत्व पाहात आलो आहे की, आपल्या वैयक्तिक जीवनात तुम्ही जी साधनशुचिता आहे, त्याचे पालन करा. पण जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असता तेव्हा जिवंत राहाण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात. तेव्हा तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की तडजोड ही फक्त जिवंत राहण्यासाठी केली आहे, हा माझा जीवन जगण्याचा मार्ग असू शकत नाही. म्हणून मी जर मुख्यमंत्री असेल तर माझ्या मंत्रिमंडळात कोणीही चुकीचं काम करत असेल तर मी करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचे काम करेल.”
“आज सुदैवाने माझ्या मंत्रिमंडळातील कोणीही व्यक्ती पाहा, तो किमान माझा इतका मान तर ठेवतो की माझे म्हणणे डावलून कोणी पुढे जात नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही भ्रष्टाचार रोखू आणि जर भ्रष्टाचार झालाच तर त्यावर कारवाई करण्याची देखील आमची तयारी आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.