मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि घडलंही तसंच राज ठाकरेंनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर आणि कणखर नेतृत्वासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत हे जाहीर केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.

राज ठाकरे भाषणात काय म्हणाले?

“येणारी लोकसभेची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. आपण खड्ड्यात जाणार की वरती जाणार आहोत. अनेक निवडणुका येतील. विधानसभेच्याही निवडणुका येतील. पण आज हाणामाऱ्या सुरु आहेत. विधानसभेला तर कोथळे बाहेर येतील. मी मागच्या भाषणात बोललो होतो महाराष्ट्रात चुकीचा फुटला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. मध्यंतरी मी पुण्याला गेलो होतो. तिथे पाचजण राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी म्हटलं कुणाचे? तिघे म्हणाले आम्ही दादांचे, दोघे म्हणाले आम्ही शरद पवारांचे. अशा सगळ्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्राकडूनही माझी अपेक्षा आहे की त्यांनी व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्याला राजमान्यता मिळाली तर भीषण दिवस आहेत.”

हे पण वाचा- राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!”

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

सस्नेह स्वागत !

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलत आहेत. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्याबरोबर का आला नाहीत? त्यावेळी सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना? आज यांना या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून आणि तुम्हाला सत्तेतून हाकलवलं म्हणून. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या गोष्टी केल्या. मी भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून विरोध केला नाही” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.