शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात बोलताना संजय राऊत यांनी "शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजेत", असं विधान केलं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. नागपूर महानगर पालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करण्यासाठी आपण नागपुरात आल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. त्यासंदर्भात बोलताना “जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती. आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू", असं राऊत म्हणाले आहेत. "नागपूरच्या मातीत वेगळेपण आहे" दरम्यान यावरून फडणवीसांनी खोचक टोला लगावला आहे. "नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल", असं फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एल्गार; म्हणाले “हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात घट्ट पाय….” पोलीस बदल्यांच्या मुद्द्यावरून संशय राज्य सरकारने बुधवारी राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र, २४ तासांच्या आत त्यातल्या १० अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश स्थगित करण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. "काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र आदेश जारी होण्याच्या अवघ्या १२ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? की प्रशासकीय चूक आहे याचा खुलासा झाला पाहिजे. याआधी सुद्धा दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. नंतर ते बदली घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात आहेत", असं फडणवीस म्हणाले.