Devendra Fadnavis महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का केली जाते आहे? असा प्रश्न गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने विचारला जातो आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी किंवा इतर कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या धोरणाला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनीही पहिलीपासून चौथीपर्यंत फक्त मातृभाषेत शिक्षण ठेवा अशी विनंती सरकारला केली आहे. आता या सगळ्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले?
माझं उद्धव ठाकरेंना एवढंच सांगणं आहे की मराठी भाषेत टोमण्यांपेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा त्यांनी उपयोग केला तर जास्त चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाही तर मराठी सक्ती आहे. हिंदी ‘ऑप्शनल’ आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण म्हणून हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. मराठी माणसासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. मराठी प्रेमींचं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. शिवसेना या लोकांना संपवायची आणि हुकूमशाही आणायची हे यांचे मनसुबे आहेत असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. दरम्यान हे वक्तव्य करण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देऊन टाकलं आहे.
राहुल गांधींना देवेंद्र फडणवीस यांचा टोला
राहुल गांधींचा देशाच्या संविधानावर, लोकशाहीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांवर बोलणार नाहीत. न्यायालयाने विस्तृत असा निकाल दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम तर्कासह, न्यायासह दिलं आहे. तरीही काही लोक झोपेचं सोंग घेऊन बसतील तर ये पब्लिक है सब जानती है. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.