Devendra Fadnavis : २०२२ मधला जून महिना हा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा महिना ठरला. कारण या महिन्यातच महाविकास आघाडी सरकार पडलं. २१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांचयासह ४० आमदारांनी उठाव केला. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे पक्षफुटीसाठी आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी यंत्रणाच अशी तयार केली होती की एकनाथ शिंदेंनी उठाव केला. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत-फडणवीस

उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला यासाठी ते आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेंना हे कळलं की उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपले पंख कापत आहेत, सगळ्या प्रकाराच्या तडजोडी करत आहेत आणि जे खातं एकनाथ शिंदेंकडे होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरेच घेऊ लागले होते. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे असे पंख कापणं सुरु केलं त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा होतीच. त्यामुळे त्यांनी तो उठाव केला. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना हे मान्यच नाही की…

उद्धव ठाकरे हे मान्यच करायला तयार नाहीत की त्यांच्या आमदारांसह त्यांचा संपर्क तुटला होता. उद्धव ठाकरेंकडे कमी खोके आहेत का? तसं काहीच नाही. उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी काय झालं माहीत आहे? एकनाथ शिंदे यांना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं आणि कन्सल्टंट आतमधे मतदान कसं करायचं सांगत होता. हा तोच दिवस होता जेव्हा एकनाथ शिंदेंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केला.

एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संपर्क केला तेव्हा मी त्यांना सांगितलं की…

एकनाथ शिंदेंनी जेव्हा महाराष्ट्राची सीमा ओलांडली तेव्हा माझ्याशी संपर्क केला. मला त्यांनी सांगितलं की मी निघालो आहे. त्यांना मी सांगितलं मी आहे काळजी करु नका. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. पुढे काय झालं ते सगळ्यांना माहीत आहेच. एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवून जो उठाव केला त्यानंतर पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. माझ्या किंवा इतर कुणाच्याही मनात बाकी कुठलीही गोष्ट आलीच नाही. मी सरकारच्या बाहेर राहणार होतो. पण माझ्या पक्षाने सांगितलं की तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. सरकारमध्ये मी होतो त्यामुळे आम्ही मजबुतीने ते सरकारही चाललं. इंडिया टीव्हीवरील आप की अदालत या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.