प्रकाश आंबेडकर यांचा दावा लातूर : सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली ही सत्ता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रश्नाच्या पाठीमागे उभे राहणारे सत्ताधारी हवेत. म्हणून वंचितच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. अण्णाराव पाटील, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. यशपाल भिंगे, अॅड. मंचकराव डोणे, सुभाष माने आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाला आपण पािठबा दिला होता, तेव्हा अनेकांनी या समाजाला आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा आरक्षण मिळाल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील, असे कोणाला वाटत असेल तर आरक्षण दिले पाहिजे ही आपली भूमिका होती. एकदा आरक्षण दिले. आता नव्या विषयाची चर्चा केली जाऊ शकते. आदिवासी मंडळींना आपल्या आरक्षणात कोणाची आडकाठी येईल असे वाटत होते तेव्हा त्यांच्या मेळाव्यात जाऊन शासनाने नव्याने सुरू केलेली डीटीएच शिष्यवृत्ती योजना बंद व्हावी, अशी त्यांची मागणी होती. या नव्या योजनेत थेट पैसे खात्यावर दिले जातात. हे पैसे खर्च कसे करायचे हे समजत नसल्याने त्या मुलांचे शिक्षण बंद पडले आहे. नव्याने आपले सरकार आल्यानंतर वसतिगृहाची जुनी योजना सुरू ठेवली जाईल असे मी त्यांना सांगितले आहे. धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न हा फार मोठा नाही. सर्वानी संघटितपणे एकत्र उभे राहिले तर हा प्रश्न मिटेल. राज्यात विधानसभेत २८८ आमदारांपैकी केवळ सहा-सातजणच धनगर समाजाचे आमदार राहिले, त्यामुळे प्रश्न मार्गी लागला नाही. धनगर समाजाच्या आमदारांबरोबर या प्रश्नाच्या पाठीशी राहणारे सरकार सत्तेत आले पाहिजे. त्यासाठी सर्वानी कटिबद्ध होण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.