धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तीन ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवार, २४ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. तर १३ ऑक्टोबरला सिमोल्लंघनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी मंदिर प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे. २४ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे.

हेही वाचा – मालवण येथील कार्यक्रम नौदलाचा, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटींचा खर्च का केला? – आमदार वैभव नाईक

हेही वाचा – निसर्ग आणि पर्यटन डोळ्यासमोर ठेवून कोकणात काम करायला आवडेल – मंत्री दीपक केसरकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कालावधीत मंदिर परिसरात दररोज तुळजाभवानी देवीचा छबीना मिरवणुकीचा धार्मिक विधी पार पडणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी धार्मिक विधी आणि त्यानंतर घटोत्थापनाने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. त्याचदिवशी रात्री नगरहून येणार्‍या मानाच्या पलंग पालखीसमवेत मिरवणूक आणि १३ ऑक्टोबरला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन होणार आहे. यंदाच्या सिमोल्लंघनात देवीच्या पालखीवर कुंकवाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. सिमोल्लंघनानंतर देवीची श्रमनिद्रा सुरू होईल. १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि १७ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची पुन्हा एकदा सिंंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. त्याचदिवशी रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबीना मिरवणूक, जोगवा व विविध धार्मिक विधी पार पडणार आहे. अशाप्रकारे नवरात्रोत्सवाचा दिनक्रम असणार आहे. दरम्यान राज्यासह परराज्यातून चालत येणार्‍या भाविकांसाठी आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, राहण्यासाठी निवास व्यवस्था करण्याचे कामही मंदिर संस्थान, पुजारी वर्ग व नगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे.