लोकसत्ता विशेष प्रतिनिधी अलिबाग : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टीने अलिबाग येथे निवडणूक नियोजनसाठी बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरीयर्सच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीतही पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांच्या उमेदवारीवरून नाराजीचा सूर लावला. पदाधिकाऱ्यांच्या मनातील खदखद जाहीररित्या समोर आली. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यावेळी अनुपस्थित राहिले. रायगड लोकसभेचा उमेदवार भाजपचा असावा असा आग्रह रायगड जिल्ह्यातील भाजप पक्षपदाधिकाऱ्यांचा होता. मात्र तरीही रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. आता पक्षश्रेष्टींनी घेतलेला हा निर्णय भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना फारसा पचनी पडला नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आणखी वाचा-अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र गेली दोन वर्ष संघटनात्मक बांधणीवर पक्षाने भर दिला. बुथ लेव्हल पर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. मेळावे घेऊन नियोजन केले. अपार महेनत घेतली.धैर्यशील पाटील हे उमेदवार असतील समजून ठिकठिकाणी मेळावेही घेतले. पण आयत्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. नेते निर्णय घेतात आणि ते निर्णय कार्यकर्त्यांवर लादतात. कार्यकर्त्यांना जुळवून अवघड होऊन बसते अशी खंत भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीत लावला. यामुळे महायुतीत धुमसत असलेला घटक पक्षातील असंतोष पुन्हा एकदा समोर आला. भाजपने १९८९ मध्ये नरेंद्र जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर एकदाही भाजपच्या उमेदवाराला निवडणूक लढण्याची संधी मिळाली नसल्याची खंत भाजपचे प हेमंत दांडेकर यांनी बोलून दाखवली. महेश मोहीते, पल्लवी तुळपुळे, गिरीष तुळपूळे, जिल्हा संघटक सतीश धारप यांनीही उमेदवार भाजपचाच असावा ही आमचीही इच्छा होती अशी खंत बोलून दाखवली. पण त्याच वेळी पक्षादेश पाळत सुनील तटकरे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. आणखी वाचा-आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’ लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजपने रायगड जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मतदारसंघ बांधणीचे काम सुरू केले होते. शेकापच्या धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केली होती. विधानसभा मतदारसंघ निहाय मेळावे आणि बैठका घेऊन वातावरण निर्मिती केली होती. हे करत असतांना सुनील तटकरे यांच्यावर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सातत्याने टीका केली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तटकरे यांच्या विरोधात एक नाकारात्मक भावना तयार झाली होती. आता त्याच सुनील तटकरे यांचा प्रचार करण्याची वेळ आल्याने भाजप नेत्यांची मोठी अडचण झाली असल्याचे या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची गैरहजेरी…. भाजपने आयोजित केलेल्या अलिबाग येथील मेळाव्याला दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील गैरहजर राहिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. धैर्यशील पाटील नाराज असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू होती. मात्र ते नाराज नसून बाहेर आहेत असे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी यावेळी सांगीतले.