आयुष्यात काही साध्य करण्यासाठी ज्ञानाची गरज आहेच. मात्र, ज्ञानाबरोबरच कर्माची जोडही तेवढीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व लातूरचे भूमिपुत्र डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
एमडी प्रतिष्ठानच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉ. तात्याराव व डॉ. विठ्ठल लहाने या बंधूंचा गौरव सोहळा दयानंद सभागृहात आयोजित केला होता. ‘शून्यातून विश्व’ या विषयावर डॉ. लहाने यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. प्राचार्य अनिरुद्ध जाधव, लहाने यांचे वडील पुंडलिकराव व आई अंजनाबाई उपस्थित होते. डॉ. लहाने यांनी आपला जीवनपटच भाषणात उलगडून दाखवला. रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथे शाळेची सुरुवातच आपल्यापासून झाली. शाळेत जाण्यायोगी १० मुले गोळा करून पहिला वर्ग सुरू झाला. शेतातील व घरातील कामे करीत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला. दहावीच्या परीक्षेत उच्चगणित विषयातील एका प्रश्नाचे लिखित उत्तर आपल्याकडे एकाने दिले. मात्र, ते त्यांना परत देऊन प्रामाणिकपणे उत्तरपत्रिका सोडवून मराठवाडय़ातून दहावा क्रमांक मिळविला. परळीत पीयूसीला शिकत असताना घरच्या आíथक परिस्थितीमुळे ‘कमवा व शिका’ योजनेत रोज महाविद्यालयाच्या झाडांना विहिरीतून पाणी आणून ५० घागरी पाणी घालत असे. औरंगाबादला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर सोबतच्या ७ विद्यार्थ्यांचा दोन वेळचा स्वयंपाक स्वत: करीत होतो. पहिलीपासूनच ज्ञान संपादन करताना कष्टाची साथ कधी सोडली नाही व त्याची कधी लाज बाळगली नाही. नेत्ररोगतज्ज्ञ झाल्यानंतरही अंबाजोगाई परिसरात डोळय़ावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण दगावतो, असा गरसमज पसरला होता तो दूर करीत शस्त्रक्रियेवर लोकांचा विश्वास वाढवत गेलो. कुष्ठरोग्यांच्या शस्त्रक्रियेनंतर दृष्टी येण्याचे प्रमाण ३५ टक्केच असते, असा परदेशामधील डॉक्टरांचा दावा होता. बाबा आमटेंच्या आश्रमात जाऊन सलग १६ वष्रे १ हजार ६९१ कुष्ठरोग्यांवर शस्त्रक्रिया केल्या. मात्र, एकही अंध झाला नाही. भारतीय संशोधन सर्वोच्च असल्याचे आपण सिद्ध करून दाखवल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत १ लाख ४७ हजार नेत्रशस्त्रक्रिया मोफत आपण केल्या. १९९५ मध्ये दोन्ही मूत्रपिंडे काम करीत नसल्यामुळे आपल्याला आईचे मूत्रपिंड मिळाले व गेल्या २० वर्षांपासून आपले उर्वरित आयुष्य समाजासाठी जगायचे, या जिद्दीने आपण काम केले. तरुणांनी ज्ञान मिळवत असताना आयुष्यात ‘देरे हरी पलंगावरी’ वृत्ती सोडली पाहिजे. पलंगाच्या खाली उतरलात, तरच हरीही तुमच्यासाठी दोन पावले पुढे येईल हे लक्षात असू द्या, असा कानमंत्र त्यांनी दिला.
डॉ. विठ्ठल लहाने यांनी गेल्या दहा वर्षांत दुभंगलेले ओठ व टाळू यावरील ६ हजार १०० शस्त्रक्रिया मोफत केल्या. जगभरात इतक्या मोठय़ा प्रमाणात मोफत शस्त्रक्रिया करण्याचा हा विक्रम असल्याचे सांगितले. आपण चांगले वागले की जग चांगलेच असते हे लक्षात असू द्या. कष्टाला नेहमी फळ मिळते यावर विश्वास ठेवून वागा, असा सल्ला त्यांनी दिला.
लहाने बंधूंचा शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उदय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अनिरुद्ध जाधव यांनी शिष्यांमुळे माझे नाव मोठे होत असल्याचे कौतुकपर उद्गार काढले. प्रा. किशोर पानसे यांनी आभार मानले.
‘भाजी-भाकरी खा, आजी-आजोबा होईपर्यंत जगा’
ऐशोरामाच्या जीवनशैलीत शहरी भागात व्यायामाकडे व आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. ‘खा पिझ्झा आणि बर्गर, व्हा आजाराने जर्जर’ ही स्थिती असून दैनंदिन आहारात भाजी-भाकरी खाल्ली तर आजी-आजोबा होईपर्यंत नििश्चत जगता येते. मधुमेह हा भारतीयांना जडलेला मोठा आजार आहे. रोज किमान एक तास व्यायाम केलाच पाहिजे. मोबाइल व टॅब संस्कृतीत लहान मुलांची दृष्टी वेगाने कमी होत आहे. मुंबईतील १ हजार ५०८ शाळांमध्ये साडेसात लाख विद्यार्थ्यांचे डोळे तपासले असता ७१ हजार जणांना चष्मा आढळून आला. याचे मुख्य कारण मोबाइल आहे. मोबाइलचा खेळणे म्हणून वापर न करता विज्ञान म्हणून वापर व्हायला हवा, असा सल्लाही लहाने यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors day success advice
First published on: 03-07-2015 at 01:55 IST