लातूरमध्ये हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, औरंगाबादमध्ये हुंड्यासाठी महिलेला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. अमरीन शेख असं पीडित महिलेचं नाव असून मुकुंदवाडी परिसरात ती वास्तव्यास होती. अमरीनच्या हत्येप्रकरणी सासू, नवरा, दीर आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातच नांदर येथील अमरीन पठाण आणि मुकुंदवाडी येथील शेख रफिक यांचा २०११ साली विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळीकडून अमरीनकडे माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. पहिल्यांदा ५० हजार रुपये घेऊन आल्या नंतर, पुन्हा पैशांची मागणी केली जाऊ लागली. पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे छळ केला गेला. छळाचं प्रमाण एवढ वाढले की त्यांनी आज तिला राहत्या घरात पेटवून दिले. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यामुळे पीडित महिलेला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. अमरीनचे वडील अब्बास पठाण यांच्या तक्रारीवरून नवरा शेख रफिक, सासरा शेख नवाब, सासू मुन्नाबी,दीर शेख जावेद यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक तपास करत आहेत.