धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. दशरथ पिंपळसे असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण २६ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असून आणखी १५ आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली.
५ जुलैला पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी महारू पवारला अटक केली होती. मारहाण करणाऱ्या जमावाचे नेतृत्त्व महारू पवारने केले होते असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच १ जुलैला ही घटना घडल्यानंतर एकूण २३ जणांना अटक करण्यात आली होती. आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या ८ दिवसात एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. धुळ्यातील राईनपाडा गावात पाच जणांना लहान मुले पळवणारी टोळी समजून जमावाने मारहाण केली होती. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्यातच या पाचजणांचा मृत्यू झाला.
नेमके काय घडले होते १ जुलैच्या दिवशी?
रविवारी १ जुलैला राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. ५ लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. दरम्यान, त्यातील एक जण एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे गावातल्या काही लोकांचा ते लहान मुले पळवणारे असल्याचा समज झाला. त्यानंतर ही अफवा बाजार परिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यांपैकी सुमारे ३५ जणांनी या पाच जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील १२ जण राईनपाडा गावाचे रहिवासी होते. मारहाण इतकी क्रूर आणि बेदम पद्धतीने करण्यात आली की या मारहाणीतच या सगळ्यांचा जीव गेला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.