आदिवासी महिलांचा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम होण्याचा प्रयत्न
पालघर : रानमेवा,भाजीपाला,रान कंद आणि फळे विक्रीतून ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधत सक्षम बनण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने या महिलांना स्वयं रोजगाराची दिशा सापडली आहे.
कोरोना काळात सर्वच व्यवसाय,उद्योग,कृषी उद्योग ठप्प झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. त्यातच ग्रामीण बहुल भागातील आदिवासींचा रोजंदारी मजुरीही बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व काही सुरळीत व जन जीवन पूर्वपदावर येत असताना ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार प्राप्त होत असला तरी कुटुंब चालवणे जिकरीचे जात होते. हे लक्षात घेत कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी या कुटुंबातील महिलांनी स्वयंरोगराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली.
जंगलातून निघणारी खाण्यालायक कंदमुळे, परसबागेत उत्पादित केलेला भाजीपाला व काही प्रमाणात फळे खरेदी करून विक्रीसाठी वैविध्यता आणत महामार्गाशेजारी विक्रीचा व्यवसाय अनेक ग्रामीण महिलांनी सुरू केला. या विक्रीतून एक महिला दिवसाकाठी पाचशे ते एक हजार रुपयांची उलाढाल करतात.
पहाटे घरातील कामे आटोपून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी या महिला कौशल्याने विक्री करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. उड्डाणपुल, राज्यमहामार्ग, महामार्ग, जोडरस्ते आदी ठिकाणी त्या ही विक्री करीत असल्याने व शेतमाल ताजा व स्वस्त असल्याने ग्राहक सहज खरेदी करीत आहेत.
रानमेवा आणि सेंद्रीय भाजीपाला
चुलीवर उकडलेल्या तुरीच्या शेंगा व गोळे, वाल—पापडीच्या शेंगा व गोळे,रताळी,रात्याचे लाल व मेढय़ाचे सफेद कोनफळ,कचरा कंद, अळू पाने, भादूरल्या, चवळी शेंगा, हिरवा हरभरा, कोवळा टाकळा, कारल्या शेवगा शेंगा, बांबूचे शिंब (वासता), उकडलेले माडाचे तरले, मेथी, पालक, कोथिंबीर,पातीचे ओले कांदे,गावठी आंबट टोमॅटो, दुधी,तिखट पाणीदार मुळा, गावठी हिरवी सालीचे लिंबू असा सेंद्रिय भाजीपाला तर पपई, चिकू, पेरू, गावठी व अमदाबाजी बोर, सफेद जांभूळ अशी फळे ग्राहकांना आकर्षित करीत असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग, चिल्हार फाटा उड्डाणपुल,मस्तान नाका उड्डाणपुल, टेन नाका उड्डाणपुल,विक्रमगड रस्ता, मनोर पालघर महामार्ग आदी महामार्गालगत ग्राहक वाहन थांबवून त्यांना हा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला खरेदी करण्याचा मोह आवरता येत नाही.
भाजीपाला, कंद आणि फळे विक्रीतून रोजगार प्राप्त होत आहे.त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत असल्याने रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. –संजना हाडळ, पागी पाडा, विक्रेती