शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. काल शपथविधीनंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक देखील झाली, यात काही निर्णय घेतले गेले. तसेच, बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत, याबाबत माहिती देखील दिली. मात्र, या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली, मग बहुमताचे दावे कशासाठी? असा सवाल करत महाविकासआघाडी सरकारवर त्यांनी आरोप केला आहे. भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे! — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019 फडणवीस यांनी यासंदर्भात आज ट्विट करत, महाविकासआघाडी सरकारला रोखठोक प्रश्न केले आहेत. ''भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!'' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा आहेत. तरीही मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा उल्लेखही नाही हे दुर्दैवी आहे, अशी पहिली टीका केली होती.