कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे. त्यात मोदी सरकारने निर्यातबंदी तातडीने लागू केली. अशावेळी आम्ही उत्पादित केलेला कांदा विकायचा कुठे आणि साठवायचा कुठे? असे दोन उद्विग्न प्रश्न नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहे. मोदी सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह कांद्यावर निर्यातबंदी लागू केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच नाराज झाले आहेत. नाशिकच्या शेतकऱ्यांनी तर थेट मोदी सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या कांदा उत्पादकांचं आंदोलन

नाशिकच्या शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह हा निर्णय घेतला खरा मात्र सध्याच्या घडीला कांदा हा बाजारात मोठ्या प्रमाणावर येतो आहे. कारण कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. अशा परिस्थितीत निर्यातबंदीचा निर्णय घेतला गेल्यानंतर आम्ही आमच्याकडे उत्पादन झालेला कांदा साठवायचा कसा आणि विकायचा कुठे? असे दोन संतप्त प्रश्न या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.

आणखी वाचा- केंद्राच्या निर्णयामुळे कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का : शरद पवार

केंद्र सरकारचा निर्णय काय?

सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कोविड १९ च्या काळात अर्थात करोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.

मात्र केंद्र सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयावर महाराष्ट्रातील नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.