अलिबाग: प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राजकारण तापले असतांनाच मुरुड आणि रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा देणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चितामणराव केळकर विद्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. सुमारे दोन हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. शेतकरीभवन, बालाजी नाका, मारुती नाका मार्गे मोर्चा जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयासमोर दाखल झाला. या ठिकाणी पोलीसांनी मोर्चा अडवला. मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर करण्यात आले. प्रकल्प विरोधी शेतकरी समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी मोर्चाला संबोधीत केले. यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश मोहीते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

हेही वाचा >>> विश्लेषण: गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, म्हणजे नेमकं काय होणार? त्याला विरोध का होतोय?

या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनींबरोबरच राहती घरेही, वाड्या वस्त्याही संपादीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बेरोजगारी बरोबरच बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे अँड. महेश मोहीते यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्यात यापुर्वीही एमआयडीसीच्या मार्फत अनेक ठिकाणी भुसंपदान करण्यात आले आहे. पण त्याठिकाणी प्रकल्प आलेले नाहीत. शेती गेली आणि प्रकल्प आले नाही, रोजगार मिळाले नाहीत आणि लोक देशोधडीला लागले त्यामुळे या कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा देणार नसल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहा तालुक्यातील भुसंपादन क्षेत्रात बड्यानेत्यांनी जागा जमिनी खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असूनही प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा दावा महेश मोहीते यांनी केला. प्रकल्प परीसरात कोणी किती जागांची खरेदी केली आहे. याची यादी माझ्याकडे आहे. लवकरच ती नावे जाहीर करणार असल्याचेही यावेळी सांगीतले.  या प्रकल्प विरोधी आंदोलनाचे मी सुरवातीपासून नेतृत्व केले आहे. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेतली आहे. त्यामुळे सत्ता बदल झाला म्हणून आता भुमिका बदलणे योग्य ठरणार नाही. मी कालही शेतकऱ्यांसोबत होतो उद्याही राहीन, पदाचा राजीनामा दिला आहे. वेळ पडली तर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. पण शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही अशी जाहीर भुमिका मोहीते यांनी यावेळी मांडली.