लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पलूस नगरपरिषदेच्या प्रक्रिया प्रकल्पातून उत्पादित करण्यात येत असलेल्या खतास सलग दुसऱ्या वर्षी राज्य शासनाचा ‘हरित ब्रॅण्ड’ दर्जा मिळाला आहे. शहरातून दररोज पाच टन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करून उत्पादित होणारे खत विक्री करण्यात येत आहे.

याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी सांगितले, पालिकेचा आरोग्य विभाग आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून खतनिर्मिती केली जात असून यातून तयार होणारे खत नत्र, स्फुरद व पालाशयुक्त असून पिकांना लाभदायी ठरत आहे. कचरा संकलनानंतर सुका कचरा विलग करण्यासाठी आठ महिला कर्मचारी असून त्याचे स्वतंत्र गठ्ठे तयार करून विकले जातात. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले आहेत. येथील यंत्रात ओला कचरा टाकून त्याची भुकटी करून प्रक्रियेद्वारे खतनिर्मिती केली जात आहे. खत तयार होण्यासाठी ३० ते ३५ दिवसांचा अवधी लागतो. आरोग्य विभागप्रमुख मानसी कदम, समन्वयक अभिषेक शिंदे, सुरेश कांबळे हे यावर नियंत्रण ठेवत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरित खतनिर्मितीबरोबरच सोनखत निर्मितीतही नगरपालिकेेनेआघाडी घेतली आहे. शहरातील मैला संकलीत करून त्यावर प्रक्रिया करून उत्तम दर्जाची सोनखत निर्मिती सुरू करण्यात आली आहे. तर यातील टाकाऊ पाणी संकलीत करून त्याचे शुद्धीकरण करून या खडकाळ माळावर फळझाडे, फुलवेली फुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर पावसाळ्यात याठिकाणी भाजीपाला निर्मिती करण्याचा मानस असल्याचे श्रीमती राशिनकर यांनी सांगितले.