‘गोकूळ’ दूध संस्थेची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी या संस्थेची निवडणूक जे सोबत येतील त्यांना घेऊन लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे कसलीही तडजोड न स्वीकारता ही निवडणूक ताकदीने निवडून आणून चांगल्या माणसांचा प्रवेश या संस्थेत करणार आहे, असे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. गोकूळ दूध संस्थेची निवडणूक लढविण्याबरोबरच पुन्हा एकदा महाडिकांशी दोन हात करण्याची तयारी त्यांनी आज दर्शविल्याने या संस्थेच्या निवडणुकीबरोबरच जिल्हयाच्या राजकारणाला नवा रंग प्राप्त होणार असल्याचे दिसून आले.
कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आíथक केंद्रिबदू म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे(गोकूळ) पाहिले जाते. गोकूळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून दूध संस्थांचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. गोकूळवर सध्या आमदार महादेवराव महाडीक यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी मंगळवारी सतेज पाटील गटाच्या मेळाव्यात करण्यात आली. पाटील यांनी महाडीक यांच्याशीच आपले वावडे असून गोकूळच्या निवडणुकीसाठी ते सोडून कोणत्याही पक्षाचे लोक सोबत आले तरी त्यांना घेऊन निवडणूक लढविण्याबरोबरच या संस्थेतील भ्रष्टाचार मोडून काढणार असल्याचे मत व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये गृहराज्यमंत्री पाटील यांचा आमदार महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक यांनी पराभव केला होता. या पराभवापासून सतेज पाटील सक्रिय राजकारणापासून बाजूलाच राहिले होते. मंगळवारी गोकूळ दूध संस्थेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी प्रथमच विश्वासू कार्यकर्त्यांच्या पाठबळावर समाजकारण करणार असल्याचे घोषित केले. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे झालेल्या मेळाव्यात सतेज पाटील यांनी गोकूळ दूध संघ ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहिले. तथापि मेळाव्याच्या सुरूवातीचा बराच वेळ त्यांनी आपल्या पराभवाचे निरूपण रंगवले.
पाटील म्हणाले, की गोकूळ दूध संघाचा कारभार अनागोंदीने भरलेला आहे. त्याचे लेखापरीक्षण अहवाल पाहता अनेक मासलेवाईक प्रकरणे पहायला मिळतात. केवळ रांगोळी काढण्यासाठी वीस हजार रुपये खर्च केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी उभारणी केलेल्या या संस्थेला गरव्यवहाराने ग्रासले आहे. सहकारी संस्था टिकण्यासाठी तेथे चांगली माणसे गेली पाहिजेत या विचाराने गोकूळची निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी माझ्याशी संपर्क साधला असून टप्प्या-टप्प्याने त्याचे संदर्भ जाहीर केले जातील. आपल्या कुटुंबातील कोणीही सदस्य ही निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उपमहापौर मोहन गोंजारे, गोकूळचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, संचालक बाबासाहेब चौगुले, मधुकर देसाई, डी.एम.पाटील, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजकर आदींची भाषणे झाली.