आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झालीये. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडलाय, घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रु पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय, अशा शब्दांमध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धेसंदर्भात भाष्य करताना पडळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडलाय. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्द्शाने ही करोनामुक्तीची स्पर्धा योजना केली आहे, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

या योजनेच्या व्यवस्थापनेचा सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत आणि या बाप्याने हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असंही पडळकर म्हणालेत.

खरंतर या पन्नास लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाहीये. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील ग्रामीण भागातील करोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं यासाठी ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा बुधवारी केली. करोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.