मधु कांबळे

देगलूर: देगलूर ते नांदेड रस्त्यावर आज सकाळपासून एकच आवाज घुमत होता व तो म्हणजे ‘ नफरत छोडो, भारत जोडो’. लहान मुलांसह अनेक जण हातात काँग्रेसचा  झेंडा नाचवत म्हणत होती ‘ भारत जोडो, भारत जोडो’. रस्त्यावरच्या आबालवृध्दांच्या तुफान गर्दीत राहुल गांधी  चालत होते. सोबत चालणाऱ्या  लहान मुलाला,  कधी युवकाला जवळ घेत, त्याच्या खांद्यावर हात ठेवत, त्यांच्याशी संवाद करत, ते पुढे जात होते.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा दुसरा दिवस. सकाळी पदयात्रा सुरू झाली. दुपारी विश्रांतीनंतर चार वाजता पुन्हा यात्रा सुरू झाली. देगलूर ते बिलोली सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता गर्दीने झाकून गेला होता. यात्रेत युवकांचा सहभाग मोठा होता. किमान चार  ते  पाच किलोमोटपर्यंत गाडय़ा आणि माणसांची गर्दी दिसत होती. टाकळी नांदेड मार्गावर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.

 कडक उन्हात रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला गर्दी पदयात्रेत सामील होण्याची वाट पाहत होती. ४ वाजून १० मिनिटांनी रस्त्यावर मंदगतीने सरकत असलेल्या गर्दीत राहुल गांधी यांचे आगमन झाले आणि गर्दीला जिवंतपणा आला. गर्दी नांदेडच्या दिशेने वेगाने सरकू लागली. रस्ता कमी पडू लागला तेव्हा राहुल गांधींच्या बरोबर चालण्यासाठी अनेक जण धावाधाव करत होते. टप्प्याटप्प्यावर ‘नफरत छोडो, भारत जोडो’ घोषणा देत पुरुष आणि महिलांचे छोटे मोठे समूह या गर्दीत सामील झाले होते. खतगाव हायस्कूलचे विद्यार्थी शालेय गणवेशात यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उभे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि घोडय़ावर बसलेल्या तरुण तरुणींची शोभायात्रा सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. त्यापुढे हातात वीणा, टाळ, चिपळय़ांचा गजरात ‘जय जय रामकृष्ण हरी’ गाणारा वारकरी भजनी समुदाय मोठय़ा जोशात भजन गात होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदयात्रा भोपळय़ाच्या टेकडीला आली तेव्हा यात्रेच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या मावळय़ांच्या वेशभूषेतील घोडेस्वारांनी लक्ष वेधून घेतले. पदयात्रा जवळ येताच वेगवान घोडेस्वारी करत, ह्णजय भवानी जय शिवाजीह्णह्ण असा त्यांनी जयघोष केला. यात्रा पुढे सरकत असताना हे घोडेस्वारसुद्धा साहसी कसरती करून लक्ष वेधत होते. तर एके ठिकाणी सनई, डफली आणि ताशाच्या पारंपरिक वाद्यांनी एक वृद्ध वाजंत्री गट सर्वाचे स्वागत करत होता.  बिजूर येथे रस्त्याच्या कडलेला असलेल्या एका शेतकऱ्याच्या घरात राहुल गांधी गेले. शेतकरी कुटुंबींयासोबत त्यांनी चहा घेतला.