दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना ही शासकीय यंत्रणेची तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची कसोटी आहे. पुढील तीन महिन्यांत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजा न घेता कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहावे तसेच कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणार्थ जनतेला मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. देवळा, सटाणा आणि कळवण येथे टंचाई परिस्थितीचा आणि विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला, त्या वेळी ते बोलत होते.
यंदा नाशिक जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ जूनपर्यंत सुमारे २०० टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.
देवळा येथे झालेल्या बैठकीत रामेश्वर धरणासह देवळा नऊ गाव पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी सुरळीत राहावी यासाठी देवळ्याजवळील साठवण बंधारा भरून देण्यात यावा, अशी मागणी आ. शिरीष कोतवाल यांनी केली. मालेगावसाठी गिरणा धरणातून ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यांसाठी चणकापूर धरणाचे २७०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आ. कोतवाल यांनी केली. या प्रसंगी आ. जयंत जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार, माजी आमदार शांतारामतात्या आहेर, जिल्हाधिकारी विलास पाटील यांसह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कळवण येथील बैठकीत भुजबळ यांनी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पाण्याचे नियोजन करून आराखडा तयार करावा आणि तो जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, दुष्काळासंदर्भात येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवून कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. अलीकडेच झालेल्या पावसामुळे तालुक्यात शेतीचे नुकसान झालेल्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी आ. ए. टी. पवार यांसह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.