मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसच्या माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हळवं होण्याची गरज नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची केली आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते इतर पक्षात जात असल्यावरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यावर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या कोणालाही पक्षात घेतले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कार्यकर्त्यांची ये-जा सुरूच असते. ताटात काय वाटीत काय असा हा प्रकार आहे. त्यामुळे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी सुपर मार्के्ट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. हा निर्णय द्राक्ष उत्पादकांसाठी आहे. दारू बंदी प्रबोधन करूनच झाली पाहिजे. लोकांनी ही बाब मनावर घेतली पाहिजे. यासाठी राजकीय पक्षांनीसुद्धा प्रबोधन करण्याची गरज आहे. मध्यप्रदेशात घरा घरात वाईन वाटली जाते तिथे भाजपा बोलत नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले. १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्दयावर मुश्रीफ यांनी खासदार संजय राऊत यांचे समर्थन केले. संजय राऊत हे बरोबर बोलले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारावर निर्णय का होत नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मास्क मुक्तीसाठी टास्क फोर्स बरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय मास्क मुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्याबाबत बोलताना, “अमेरिका, फ्रान्स मध्ये मास्क मुक्त केले आहे. आपल्याकडे प्रादुर्भाव कमी आहे. म्हणून यावर चर्चा झाली आहे. मात्र टास्क फोर्स बरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. इतक्यात हा निर्णय होईल असं वाटत नाही,” असे मुश्रीफ म्हणाले.