राज्यात अतिवृष्टीने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडेल अशी अशी शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रायगड, चिपळूण, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पुरात अडकलेले आहेत. तर, कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग देखील बंद झालेले आहेत. पुरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील  महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून  देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Blog

Highlights

    21:09 (IST)23 Jul 2021
    वैतरणा नदी पात्रात विद्युत वाहिन्यांवर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश

    विजेचे खांब पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू असताना वैतरणा नदीच्या पात्राच्या मध्यात वीजवाहिन्यांवर अडकलेल्या कामगारांना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास एनडीआरएफच्या जवानांकडून बाहेर काढण्यात  यश आले. शुक्रवारी सकाळपासून नदीच्या प्रवाहातून मार्ग काढत दोन खांबांमध्ये वीजवाहिनी जोडण्यासाठी पलीकडे नेण्याचे काम सुरू होते. मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असे रेस्क्यू केलेल्या कामगारांची नावे आहेत

    20:36 (IST)23 Jul 2021
    महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष

    कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. सकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे. एनडीआरएफच्या २६ चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-१७, दोन सी-१३० तसेच एक एमआय-१७ हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक ४ चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात ३, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी २, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी १ चमू तैनात आहे. 

    20:16 (IST)23 Jul 2021
    पुण्यात जोरदार पावसामुळे १५ झाडपडीच्या घटना

    पुणे शहरात जोरदार पावसामुळे मागील बारा तासात १५ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर रास्ता पेठेत रस्त्यावरून जाणार्‍या रिक्षावर झाड पडले. या घटनेत रिक्षाचालक आणि एक पादचारी महिला जखमी झाली आहे.वेगवेगळ्या दुर्घटनेत ५ चार चाकी, १ रिक्षा आणि एका सायकलचे नुकसान झाले आहे.

    20:08 (IST)23 Jul 2021
    बचाव पथकाला सहकार्य करा- सतेज पाटील, पालकमंत्री

    मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बचाव पथकाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तसेच मुसळधार पावसाचा अंदाज पाहता पुढचे ४८ तास घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.


    19:57 (IST)23 Jul 2021
    कोकणात एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या रवाना

    कोकणातील पूरस्थिती पाहता एनडीआरएफच्या ८ अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. हवामान खात्यानं येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    19:03 (IST)23 Jul 2021
    मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम

    कोकणातील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने ३० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १२ एक्स्प्रेसचं मार्ग बदलण्यात आलं आहे.

    18:42 (IST)23 Jul 2021
    खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

    खडकवासला धरणातून २४,०५६ क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

    18:28 (IST)23 Jul 2021
    सातारा: एनडीआरएफच्या टीमने २२१ जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

    17:56 (IST)23 Jul 2021
    दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

    राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात तळई मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

    17:38 (IST)23 Jul 2021
    पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलंडत असल्याने पुराची शक्यता
    17:26 (IST)23 Jul 2021
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा

    राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन देण्यात आले आहे.

    16:24 (IST)23 Jul 2021
    महाराष्ट्राला दिलेल्या मदतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी मानले आभार
    16:19 (IST)23 Jul 2021
    तळई दुर्घटना : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील तळई गावातील दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधानांनी ट्विट करत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे असे म्हटले आहे. वाचा सविस्तर...

    15:55 (IST)23 Jul 2021
    सातारा : पाटण, जावळी, वाई येथे दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू ; चार जण पुरात वाहून गेली

    साताऱ्यातील पाटण, जावळी, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  जावळी व वाई या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन असे एकूण चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

    15:46 (IST)23 Jul 2021
    पुणे : केईएम रूग्णालयासमोर रिक्षाचालकाच्या अंगावर झाड कोसळलं

    पुण्यातील रास्ता पेठ, केईएम रुग्णालयासमोर मोठे झाड कोसळून रिक्षाचालकाच्या अंगावर पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड बाजूला करून, रिक्षाचालकाला बाहेर काढले.

    15:32 (IST)23 Jul 2021
    कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता

    कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आज व उद्या अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, किनारपट्टी भाग व कर्नाटकाच्या दक्षिण भागातही आज अतिवृष्टीच शक्यता वर्तवली गेली आहे.

    14:29 (IST)23 Jul 2021
    चिपळूणची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात; २२ बोटींद्वारे बचाव कार्य सुरू

    चिपळूणची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. २२ बोटींद्वारे बचाव कार्य करण्यात येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. वाशिष्टी नदीचे पाणी पात्रात  गेले आहे. पण अजून सखल भागात पाणी आहे. वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद झाला आहे. आपद्ग्रस्तना पाणी, जेवणवाटप सुरू आहे. दुचाकी व चार चाकी गाड्या , दुकानांचे व बाजारपेठेतील  व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत अंदाजे १ हजार २३१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. विद्युत पुरवठा सुरू करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत. धामनंद (ता.खेड) येथे दरड कोसळले मुळे ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, अंदाजे १६ ते १७ व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली  अडकले  असण्याची शक्यता आहे. तिकडे  एनडीआरएफची तुकडी रवाना झाली आहे. हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. नौदल व लष्कराचे जवान मदतीसाठी पोहोचत आहेत.

    13:52 (IST)23 Jul 2021
    परिस्थिति चिंताजनक आहे, राहील - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सावधगिरीचा इशारा

    गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे.  आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहे. अनपेक्षित असं संकट आहे. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढत आहे. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत.  काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे. त्यानुसार लष्कर, हवाई दल, नेव्ही. एनडीआरएफ सर्वांकडून मदतकार्य आणि बचावकार्य करत आहेत. धरणं आणि नद्या ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. हे सगळं करत असताना करोनाचं संकट टळलेलं नाही. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे

    13:34 (IST)23 Jul 2021
    रायगड - महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू

    रायगडमधील  महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून भयानक दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, आणखी ४० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणच्या ३२ घरांवर काल संध्याकाळी दरड कोसळली होती.  विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर , माजी मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री आदिती तटकरे , आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    13:22 (IST)23 Jul 2021
    कोल्हापूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्रच महापुराच्या विळख्यात

    कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महापुराचे पाणी साचले आहे. आपत्ती व्यवस्थापन करणारे केंद्र केंद्रच महापुराच्या विळख्यात सापडले आहे.

    13:20 (IST)23 Jul 2021
    कोल्हापूर- सांगली वाहतूक बंद

      पुणे- बंगळुर हायवे लगत असणारा सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा सर्विस रोड व बंगळुर पुणे कडून शिरोलीकडे जाणारा सर्विस रोडवर ३-४ फूट पाणी साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर, लसांगली फाटा ते सांगली या मार्गावर शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाईन येथे रोडवर पाणी साचल्याने रस्ता बंद असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. वरील ठिकाणी बेरीकॅटींग करून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस गस्त सुरू आहे.

    13:20 (IST)23 Jul 2021
    पुणे -बंगळुर राष्ट्रीय महामार्ग बंद ; शेकडो वाहने रस्त्यावर थांबून

    कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका तसेच बेळगाव जिल्ह्यातील यमगर्णी व निपाणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. शेकडो वाहने रस्त्यावर थांबून आहेत.

    13:10 (IST)23 Jul 2021
    मेळघाट : धारणी ते राणीगाव मार्गावर दरड कोसळल्याने दहा गावांचा संपर्क तुटला

    मेळघाट : धारणी ते राणीगाव मार्गावर दरड कोसळल्याने दहा गावांचा संपर्क तुटला, रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    12:57 (IST)23 Jul 2021
    चिपळूणसह कोकणतील पूर परिस्थितीबाबत फडणवीसांची मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा

    चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच, या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांना सांगितले. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो. असंही फडणवीस म्हणाले आहेत.

    12:43 (IST)23 Jul 2021
    महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली

    महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे.  महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.  महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच, एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले आहे.

    12:36 (IST)23 Jul 2021
    चिपळूणजवळ मिरजोळी येथून ५६ नागरिकांची पुरातून सुटका

    चिपळूणजवळ मिरजोळी येथून ५६ नागरिकांची पुरातून सुटका करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला दणका दिला व प्रचंड वित्तहानी केली आता मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचं पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे.

    12:27 (IST)23 Jul 2021
    खेड तालुक्यात घरांवर दरड कोसळल्याने १७ जण अडकले; बचावकार्य सुरु

    सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वाचा सविस्तर..

    12:26 (IST)23 Jul 2021
    चिपळूणमध्ये ब्रिटीशकालीन पुलाचा भागही गेला वाहून

    कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला दणका दिला व प्रचंड वित्तहानी केली आता मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचं पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे
    आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे 

    11:49 (IST)23 Jul 2021
    चिपळुणमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मोहीम सुरू

    चिपळुणमध्ये पुरात अडकलेल्या चिपळुणातील नागरिकांना वाचवण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून जोमाने मदतकार्य सुरू झाले आहे. शासकीय यंत्रणेसह राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मदत कार्यास लागले आहेत. नागरिकांना बोटींच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले जात आहे. 

    11:23 (IST)23 Jul 2021
    सातारा-महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच ; कोयना व धोम धरणातून पाणी सोडले

    सातारा महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसाने कोयना धोम धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून ५०हजार क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे दोन धरणातही  कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे

    11:18 (IST)23 Jul 2021
    माणगाव -पाचाड मार्गे महाड रस्ता वाहतुकीठी मोकळा

    माणगाव-महाड दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील पाणी ओसरल्याने  हा  रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तसेच गोरेगाव, दापोली  रस्ता  सुरु  झाला  आहे

    11:11 (IST)23 Jul 2021
    सातारा: पाटण तालुक्यात दरड कोसळून चार घरे ढिगाऱ्याखाली गेली; १४ लोकांचा शोध सुरू

    पावसाने रौद्ररूप धारण केल्याने दरड कोसळून ढिगाऱ्याखाली चार घरे गेली त्यात १४ लोक आडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. ही मोठी दुर्घटना काल रात्रीच्या सुमारास पाटण तालुक्यातील मोरणा विभागात खालचे आंबेघर येथे घडली. या भयानक प्रकार निदर्शनास येताच स्थानिक लोक व प्रशासनाने घटना स्थळाकडे धाव घेतली आहे. परंतु, तूफान पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. वसंत कोळेकर, ज्ञानजी कोळेकर, विनायक कोळेकर व रामचंद्र कोळेकर अशा चार शेतकऱ्यांची घरे दरड कोसळून ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने घटनास्थळी एकच हाहाकार माजला आहे.  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हाधिकारी शेखर सिंह हेही घटनास्थळाकडे निघाले आहेत.

    10:20 (IST)23 Jul 2021
    चिपळुणात कालपासून अडकलेली तुतारी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना

    चिपळुणात कालपासून अडकलेली तुतारी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना. सर्व प्रवाशांना कोकण रेल्वेकडून नाश्ता/जेवण व्यवस्था. रोह्यापासून राजापूरपर्यंत विविध स्थानकांवर थांबवलेल्या गाड्या. जवळच्या अंतरानुसार मुंबई किंवा मडगावच्या दिशेने मागे फिरवल्या आहेत.

    10:13 (IST)23 Jul 2021
    चिपळुणात बचावकार्य सुरु

    चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू झालं आहे पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी उतरली असून अजूनही अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले आहेत. 

    09:46 (IST)23 Jul 2021
    अतिवृष्टी : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नेव्ही’कडून बचाव कार्य सुरू

    राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, गावांना पूराने वेढा दिल्याने नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये नेव्हीची पथक दाखल झाली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून नौदलाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.

    09:10 (IST)23 Jul 2021
    महाड एमआयडीसी मधील कारखान्यात रात्री स्फोट; भीषण आग

    रायगडमधील महाड एमआयडीसी मधील कारखान्यात रात्रीच्या सुमारास  स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. विनती ऑरगॅनिक कारखान्यात आग लागली होती. त्यानंतर आज पहाटे पुन्हा आणखी एका कंपनीत आग लागल्याची घटना घडली. अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. एमआयडीसी चे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

    09:07 (IST)23 Jul 2021
    वर्ध्यात पुराच्या पाण्यात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेली
    09:03 (IST)23 Jul 2021
    पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू

    पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची,  महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून माहिती दिली देण्यात आली आहे. पाच  लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. चार जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

    09:01 (IST)23 Jul 2021
    खडकवासला धरण साखळीत २४ तासात ५ टीएमसी पाऊस, नदी पात्रात २ हजार ५५३ क्युसेकने विसर्ग सुरू

    राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून असाच पाऊस पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. तर मागील चोवीस तासात पाच टीएमसी एवढा पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरणातून नदी पात्रात २ हजार ५५३ इतका सुरू असल्याचे पाटबंधारे विभागा मार्फत सांगण्यात आले आहे. 

    08:47 (IST)23 Jul 2021
    रायगडमध्ये पूर आणि दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

    रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे व दरड कोसळल्याच्या विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Helicopter arrives in raigad to rescue flood victims msr
    First published on: 23-07-2021 at 07:56 IST