राजापूर : मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका काहीजणांनी अचानक हल्ला करून फोडण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने घोषणा देत हातिवले येथील टोलनाक्याकडे अनपेक्षितपणे मोर्चा वळवला आणि तेथील केबीनची मोडतोड केली. अचानक घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी राजापूर पोलिसांनी सायंकाळी उशिरा दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत बोलताना या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल नापसंती व्यक्त करत संबंधितांना जरब बसेल, अशी कृती करण्याची चिथावणी दिली. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.