Pratap Sarnaik Statement on Hindi Language : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाषिक वाद निर्माण होतोय. परप्रांतीयांकडून मराठी भाषेला विरोध केला जात असताना आता परप्रांतीयांचा मतदारसंघ असलेल्या भागात हिंदीच ही मराठीची बोलीभाषा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
प्रताप सरनाईक म्हणाले, “ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये माझा मतदारसंघ आहे. ठाण्यात जनतेशी मी बोलतो तेव्हा मी शुद्ध मराठीत बोलतो. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश करताच माझ्या तोंडून हिंदी भाषाच निघते. मराठी ही आमची मातृभाषा, आमची आई आहे. पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे. या लाडक्या बहिणींमुळे २३७ जागांवर आलो आहेत.”
“हिंदी ही आपल्या मुंबईची बोलीभाषा बनली आहे, मुंबईसारखी कुठेही शुद्ध हिंदी नसेल. हिंदी बोलताना मध्येच एखादा शब्द इंग्रजी किंवा मराठीत येतो. त्यामुळे हिंदी ही आपली बोलीभाषा झाली आहे”, असंही ते म्हणाले.
मराठीबाबत तुमची हीच भूमिका आहे का?
प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. “मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला मराठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि हेच लोक आता म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत. त्यांच्या नेत्यांना विचारा की त्यांची भूमिका आहे का? मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? त्यांचा जो विचार आहे तो हा भाजपाचा विचार आहे, हा अमित शहांचा विचार आहे. मी वारंवार सांगतो त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शाह आहेत. त्यामुळे शाह जे बोलतात, तेच हे लोक बोलतात”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं
“सरकारचा हा निर्णय हा निर्णय. मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे. तुम्हाला काय आवडतं, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.