हिंगोली : दोन महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत गटबाजीला वैतागून काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देसाई यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अलिकडच्या काळात अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, त्यात देसाई यांच्या राजीनाम्याची भर पडली.

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला. पक्षाने भाऊ पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविली. दरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी मात्र नेटाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम केले. गोरेगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढविल्यामुळे त्यांचा काँग्रेसशी संबंध उरला नव्हता. पर्यायाने काँग्रेस पक्षाची संपूर्ण सूत्रे आमदार प्रज्ञा सातव यांच्या हाती गेले. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत गटबाची दूर होईल, असा कयास बांधला जात होता. मात्र, अचानक दोन महिन्यांपूर्वी दिलीप देसाई यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न चालविले. त्यासाठी भाजपने ओबीसीची मतपेढी बळकट ठेवण्यासाठी माजी आमदार गजानन घुगे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर आता घुगे यांनीही राजकीय अनुभवपणाला लावण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांचा धडाक्यात भाजपामध्ये प्रवेश करून घेतला, अशी चर्चा सुरू झाली आहे.