सोलापूर शहर व परिसरात रविवारी होलिकोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्तरावर होळी पेटविण्यात आली. तथापि, यंदा गारपीट व वादळी वा-यांसह अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच कोलमडल्याचा परिणाम होलिकोत्सवावर झाला. बंजारा समाजाच्यावतीने गारपिटीचे दु:ख बाजूला ठेवून होळी पेटविण्यात आली.
उन्हाळ्याची चाहूल देणा-या होळीच्या सणासाठी शहरात तरूण कार्यकर्त्यांनी लाकूड, शेणी आदी साहित्य गोळा करून सायंकाळनंतर होळी पेटविली. नंतर होळीभोवती शिमगा केला. ग्रामीण भागात होळीनिमित्त उत्साह असतो. परंतु यंदा गारपीट व वादळी वा-यांसह पडलेला पाऊस व त्यामुळे पिकांची झालेली प्रचंड हानी, घरांची पडझड, जनावरे व पक्ष्यांना गमवावा जीव याचे सावट होळी उत्सवावर पडले होते. काही गारपीटग्रस्त गावांमध्ये होळी साजरी झाली नसल्याचेही सांगण्यात आले.
तथापि, होळी व बंजारा समाजाचा धार्मिक व सांस्कृतिक संबंध अनोखा असून त्याची जपणूक पूर्वापार परंपरेने केली जाते. त्याचा प्रत्यय यंदा दिसून आला. लमाण तांडय़ावर पहाटेपासूनच होळीचा आनंद ओसंडून वाहत होता. भल्या पहाटेच लमाण तांडय़ांवर होळी पेटविण्यात आली. तांडय़ावर बंजारा समाजाच्या नाईकांकडून होळी पेटविली गेल्यानंतर पाच फे-या मारून शिमगा केला गेला. त्यानंतर महिलांनी फेर धरून पारंपरिक लोकगीते सादर केली. तर, सायंकाळी विवाहित बंजारा महिलांनी होळीभोवती फेर धरून पूजा केली. या वेळी पुरूष मंडळींनी परंपरेनुसार नगारा वाजवून व काठय़ा चालवून होळीभोवती फेरी मारली.