कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनावर टाकलेल्या बहिष्कारावर तोडगा म्हणून निवृत्त शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी ३५ हजार आणि मॉडरेटिंगसाठी १० ग्हजार असे एकूण ४५ हजार निवृत्त शिक्षक उभे राहणे हे अव्यवहार्य असल्यामुळे ही पोकळ धमकी ठरण्याची शक्यता ठरणार आहे. या शिक्षकांच्या बहिष्काराबाबत निर्णय घेण्याच्या किंवा या शिक्षकांवर कारवाई करण्याबाबतच्या शासनाच्या दिरंगाईच्या धोरणाचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसणार आहे.
राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पंधरा दिवस उलटूनही बारावीच्या उत्तरपत्रिका गोदामात पडून आहेत. या परिस्थितीवर तोडगा म्हणून निवृत्त शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय पोकळ धमकी ठरण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी बसले आहेत. बारावीच्या साधारण ७५ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होणे अपेक्षित आहे. वैकल्पिक आणि अनिवार्य विषय धरून ४५ विषयांची परीक्षा घेतली जाते. साधारणत: ३५ हजार शिक्षक बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक आहेत.  यामध्ये प्रत्येक माध्यमामध्ये प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक चार शिक्षकांमागे एक मॉडरेटर आणि १९१ चिफ मॉडरेटर असणे आवश्यक आहे. हा डोलारा सांभाळण्यासाठी आवश्यक निवृत्त शिक्षक मिळण्याची शक्यता नाही.
सध्या प्रचलित अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये शिक्षक मिळणेच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निकालाच्या प्रक्रियेमध्ये चुका झाल्यास त्यासाठी निवृत्त शिक्षकांना जबाबदार धरता येणार का आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई करता येणार का, असाही प्रश्न  निर्णयाने उपस्थित केला आहे.

बारावीचा निकाल कधी लागणार?
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचे सत्र जसजसे लांबत चालले आह,े तसतसा बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ‘राज्य शिक्षण मंडळा’वर असलेला ताण वाढत चालला आहे. हा बहिष्कार आणखी काही काळ लांबल्यास बारावीचा निकाल मे महिन्यापर्यंत जाहीर करणे मंडळाला शक्य होणार नाही.
निकालाचे अंदाजित वेळापत्रक (चार्ट)
उत्तरपत्रिका कस्टोडियन्सकडून परीक्षकांकडे पाठविणे – २ ते ३ दिवस
परीक्षकांचे काम (प्रत्येकी २५० ते ३०० उत्तरपत्रिका) – १० ते १२ दिवस
मॉडरेटर्सचे काम (प्रत्येकी १ हजार उत्तरपत्रिका) – १० ते १२ दिवस
विभागीय मंडळ स्तरावर उत्तरपत्रिकेवरील यूआयडी व गुणांचा तपशील फाडून पुण्यातील मुख्यालयाकडे पाठविणे – १० ते १२ दिवस
गुणांचे तपशील संगणकात भरणे आणि विषयवार निकाल एकत्र करणे (राज्यमंडळामधील काम) – २० दिवस
संकेतस्थळावर निकाल अपलोड करणे – १ दिवस
काम न करणाऱ्या परीक्षकांची यादी मागविली
उत्तरपत्रिका तपासणीवर राज्यभरातील तब्बल ६० हजार शिक्षकांचा बहिष्कार असला तरी काही शिक्षक या बहिष्कारापासून लांब आहेत.
त्यामुळे, काही केंद्रांवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. कोणते परीक्षक कामात सहभागी नाहीत, याची माहिती घेण्याचे कामही मंडळाने सुरू केले आहे.