पुणे : मार्चच्या पहिल्या टप्प्यातही उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी राज्याच्या विविध भागात उष्णतेची लाट आली असतानाच आता शेवटच्या टप्प्यातही राज्याच्या विविध भागांत उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मार्चचे शेवटचे चार दिवस राज्यासाठी दाहक ठरण्याची शक्यता आहे. या चार दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेची लाट येणार असून, उर्वरित भागातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ानंतर राज्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवू लागला होता. या काळात सुरुवातीला मुंबई परिसरासह कोकणात बहुतांश भागात उष्णतेची लाट आली होती. त्यानंतर विदर्भात उष्णतेची लाट आली. राज्याच्या काही भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपुढे गेला होता. त्यानंतरच्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि राज्याच्या दिशेने येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने उकाडा वाढला. सद्य:स्थितीत विदर्भात काही भागांत उष्णतेच्या लाटेप्रमाणे वातावरण आहे. विदर्भातील सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.शनिवारी (२६ मार्च) याच भागात देशातील उच्चांकी ४२.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर आहे. मराठवाडय़ात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. मुंबई परिसरासह कोकणात कमाल तापमान सरासरीच्या जवळ आहे. उष्णतेची लाट कशामुळे? दक्षिणेकडील काही भाग वगळला, तर देशात बहुतांश भागात सध्या कोरडे हवामान आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानसह इतर राज्ये आणि गुजरातपासून मध्य प्रदेशपर्यंत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि महाराष्ट्राच्या दिशेने कोरडे आणि उष्ण वारे वाहत आहेत. त्यातच राज्यात निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पुढील चार दिवस विविध भागात उष्णतेची लाट येणार आहे. उष्णतेची लाट कुठे? हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भामध्ये ३० मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत २९ ते ३१ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.