अहिल्यानगर: महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे जास्त रकमेची वीज देयके मिळत असल्याने संतप्त नागरिकांनी भिस्तबाग महावितरण कार्यालयात जाब विचारत कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी कार्यालयाला टाळे ठोकत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली भिस्तबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी महावितरणच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यासंदर्भात माहिती देताना शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांनी सांगितले की, शहरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे.
नागरिकांना सरासरी २ ते ३ हजार रुपयांची जास्त वीज देयके येत आहेत. याआधी जुन्या मीटरवरून सरासरी केवळ ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत वीज देयके मिळत होती. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर देयकात मोठी वाढ झाली आहे. जोपर्यंत जुने मीटर पुन्हा बसविले जात नाहीत व वाढीव वीज देयके रद्द किंवा कमी करून दिली जात नाहीत तोपर्यंत महावितरणचे भिस्तबाग कार्यालय बंद ठेवले जाईल.
महावितरणने तातडीने तोडगा काढावा तसेच ग्राहकांनी वीज देयके भरणे थांबवावे. सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत एका सामान्य कुटुंबाला महिन्याला दोन ते तीन हजार रुपयांचे वीज देयक भरणे शक्य नाही. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर महावितरण विरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.
डॉ. बोरुडे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १ मधील तपोवन रस्ता, भिस्तबाग महाल, पवननगर, गोकुळनगर, डॉन बॉस्को, लक्ष्मी टॉवर्स आदी भागातील नागरिकांना सरसकट तीन पट वीज देयके पाठवण्यात आली आहेत. लोकांचा आर्थिक बोजा वाढला आहे. पूर्वसूचना न देता ठेकेदार स्मार्ट मीटर बसवत आहे व जुने मीटर घेऊन जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा गोंधळ सुरू आहे. नागरिकांनी अनेकवेळा कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार जुने मीटर अधिक विश्वासार्ह होते. त्यावर आलेली वीज देयके वाजवी होती. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर यंत्रणेतील पारदर्शकता हरवली आहे.