रत्नागिरी – दापोली तालुक्यातील गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची वांती) जप्त करण्यात आली आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील कस्टम विभागाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवा किल्ल्याजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर शोध मोहीम राबवली. या मोहिमेत पांढऱ्या-हलका तपकिरी रंगाचा, अत्यंत चिकट जेलीचा गोळा आढळून आला. तपासणीअंती तो दुर्मिळ ‘अंबरग्रीस’ असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या या पदार्थाचे वजन ४ किलो १४० ग्रॅम असून, त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.