जालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करायला संजय राऊत हे काय राज्याचे नेते आहेत, असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी या संदर्भातील राऊत यांचे वक्तव्य फेटाळून लावले.
सक्तवसुली संचालनालयाकडून अटक होण्याच्या अगोदर शिंदे यांनी फोन करून अमित शहा यांच्याशी या संदर्भात बोलू का, असे विचारले होते. परंतु आपण तुरुंगात जाऊ पण तुमच्या पक्षात येणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचा दावा राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने केला होता. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर दानवे म्हणाले, ‘मला वाटत नाही शिंदे यांनी असा फोन केला असेल. शिंदे फोन कशासाठी करतील, फोन करायला संजय राऊत हे काय महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांच्या पाठीमागे काय मतदान आहे, ते काय राज्याच्या निवडणुका जिंकून देऊ शकतात का, असे सवालही दानवे यांनी या संदर्भात उपस्थित केले.
राऊत यांचे पुस्तक केवळ इतरांवर आरोप करण्यासाठी आहे. त्याच्याऐवजी त्यांनी आपल्याला तुरुंगात जाण्याची वेळ का आली, याबाबत लिखाण करायला पाहिजे. त्यांच्यावर आरोप कोणते होते आणि कोणी केले होते हे त्यांनी लिहावे. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता म्हणून काही ते तुरुंगात गेले नव्हते, असेही दानवे म्हणाले.