रत्नागिरी : केरळच्या धरतीवर कोकणात नारळाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ वाणाची लागवड करण्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये शिफारस केली आहे. या वाणाच्या लागवडीमुळे कोकणात आणखी नारळ उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या समितीच्या कार्यशाळेत ही शिफारस करण्यात आली असून ‘केरा केरलम’ नारळाचे प्रती माड प्रती वर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन देते. खोबरे प्रती नारळ १७० ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६९ टक्के असते. तसेच त्याच्या उत्पन्नामध्ये सातत्य कायम रहाते.
महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टी भागात नारळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या जमीन क्षेत्रा खाली नारळ पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र कोकणात आता पर्यत पारंपरिकपणे ‘बाणवली’ या उंच माडाची लागवड जास्त करण्यात आली आहे.
भारतामध्ये आतापर्यत नारळ पिकाखाली २१.९० लाख हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. त्यातून २१,२०७ दशलक्ष नारळ उत्पादन होत आहे. जगाच्या उत्पन्नाच्या एकूण ३१ टक्के उत्पन्न हे भारतात होते. भौगोलिक क्षेत्रात भारताचे स्थान १७.१५ तृतीय क्रमांकावर असला तरी नारळ उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावर आहे.
कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने सन २०११ पासूनच भारतात विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार नारळाचे अधिक उत्पादन देणारे ‘केरा केरलम’ हे वाण आता कोकणातील नारळ बागायतदारांसाठी आशादायी ठरले आहे.
परभणी येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये नारळाच्या ‘केरा केरलम’ या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या संशोधन कार्यात नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. पराग हळदणकर यांचे योगदान महत्वाचे आहे.