नांदेड: अजित पवारसमर्थक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार सुरू केल्यानंतर त्यांच्या कन्येची भाजपमध्ये कोंडी करण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या गेल्या आठवड्यातील दौऱ्यात प्रणीता चिखलीकरांसह नायगावचे आमदार राजेश पवार यांची पत्नी पूनम पवार यांना बेदखल करण्याची व्यवस्था चव्हाण गटाने केली.

प्रणीता आणि पूनम या दोघीही मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असून, महिला आघाडीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्या, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांच्या नांदेड दौऱ्याचे संपूर्ण नियोजन आपल्या हाती राखणाऱ्या चव्हाण गटाने विमानतळ, विश्रामगृह आणि सभेचे व्यासपीठ इत्यादी ठिकाणच्या प्रवेशिकाधारकांच्या नावांमध्ये वरील दोघींना ‘अर्धचंद्र’ दिल्याचे समोर आले आहे.

भाजप नेत्यांचा दौरा पार पडून पाच दिवस उलटल्यावरही या दौऱ्यातील स्थानिक कुरबुरी बाहेर येत आहेत. चव्हाण गटाने व्यासपीठावरच्या स्थानिक प्रतिनिधींमध्ये केवळ आपलेपणा जपला. पक्षातील कृतिशील आणि उपक्रमशील दिलीप ठाकूर आणि अनेकांना वगळले. पूनम पवार यांनी व्यासपीठ प्रवेशिकेची मागणी करूनही त्यांना ती दिली गेली नाही.
प्रणीता चिखलीकर यांना स्थानिक भाजपत प्रभावी झालेल्या गटाकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचे वारंवार दिसले. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान नांदेडला थांबण्याचे त्यांनी टाळले. आमदार चिखलीकर गतवर्षी ‘राष्ट्रवादी’त दाखल झाले तेव्हा भाजप नेते देवेन्द्र फडणवीस यांनी प्रणीता यांना भाजपतच राहण्याची सूचना दिली होती. त्यानुसार त्या पक्षामध्ये असल्या, तरी त्यांना बेदखल करण्याचे धोरण नवनेते रेटत आहेत.

भाजप नेत्यांच्या दौऱ्यात पक्षातील आजी-माजी आमदारांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. त्यांना सर्व ठिकाणी प्रवेश होता, तरी तो केवळ उपस्थितीपुरता मर्यादित होता. आमदारांना वाहनांतून हजारो लोकांना आणा, असे सांगितले गेले, पण त्यांना व्हीआयपी कक्षाचे मोजकेच पास देण्यात आल्याबद्दल आमदार राजेश पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रणीता चिखलीकर-देवरे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून बेदखल करण्यात येत असल्याच्या प्रकाराबद्दल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. भाजप नेत्यांच्या दौऱ्याआधी आणि त्यानंतर काही दिवस मौन धारण करणाऱ्या चिखलीकर यांनी, आपण भाजप स्वतःहून सोडला नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीत माझा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संमतीने मला त्या पक्षात जावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.