रत्नागिरी : कोकणची बुलंद तोफ आणि महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या आमदार, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणून आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे. पण आज त्यांचे एक वेगळेच रूप पहावयास मिळाले. चक्क घरकाम करणा-या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधव यांचे अश्रु अनावर झाले.
गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती. पण, तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले आणि आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले.
सुप्रियाचे लग्नासाठी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले, तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने त्यांची पत्नी सौ. सुवर्णा जाधव आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि रडू लागली. तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.. काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, ‘सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.’
आमदार भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत, प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, कोण वावगे वागले तर ते रोखठोकपणे बोलतात, मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो वा घरातली, त्याचा ते विचार करत नाहीत. ते कणखर आहेत, पण, ते किती हळवे आहेत, हे लग्नातील प्रसंगाने सर्वांसमोर आले आहे. कुठलेही काम करताना किंवा कुणाला मदतीचा हात देताना जात, पात, धर्माचा ते कधीच विचार करत नाहीत. सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, जातीतली सुद्धा नाही. तरीदेखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले, हा सर्वांसाठीच एक आदर्श ठरला आहे.