मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव द्यायचे की नाही? यावरून सध्या राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. एकीकडे भाजपाकडून याला जोरदार विरोध केला जात असतानाच दुसरीकडे २०१३मध्ये भाजपानंच एका रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलेलं असताना आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. भाजपाच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट संविधानाच्या मूळ प्रतीमधलाच एक फोटो शेअर केला असून त्यात उलट विरोधकांनाच प्रतिप्रश्न केला आहे.

“हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे खरे उत्तर. संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांच्या पराक्रमाला स्थान देऊन गौरविण्यात आलं आहे. आता तुम्ही ठरवा जे संविधानात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.

दरम्यान, यासोबतच आव्हाड यांनी भाजपाला खोचक टोला देखील लगावला आहे. “मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी २०१३ चे टिपू वेगळे, २०२२ ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आता आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

“आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या”, टिपू सुलतान वादावरून भाजपाचा शिवसेनेवर निशाणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद काय आहे?

मुंबईतील मालवणी भागात एका मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचं बांधकाम झालं आहे. मात्र, हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मैदानाला देऊ नये, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. तर, भाजपाने देखील मुंबईतल्या एका रस्त्याला ‘वीर टिपू सुलतान’ असं नाव दिलेलं आहे, असा दावा अस्लम शेख यांनी केला आहे.