राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांनी संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं लिहून ठेवलं आहे. असा दावा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरद्वारे केला आहे. तसेच त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांची पानं शेअर केली आहेत. ज्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिलं आहे. सावरकर आणि गोळवलकर यांच्या पुस्तकातील ही पानं असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाडांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा – “तुम्ही कसे मूर्ख…”, आव्हाडांनी औरंगजेबबाबत केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

आव्हाडांच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आव्हाडांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे पान तुम्हीच पूर्णपणे वाचा. यामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच कौतुकच केलं आहे. तुमच्या आग लावू वृत्तीप्रमाणे काही वाक्यांना आधोरेखित करून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम बंद करा. देशाच्या शहीदांना नव्हे तर चकमकीत मृत्यू झालेल्या अतिरेक्याला घरी जाऊन चेक देणाऱ्याकडून काय अपेक्षा?” असा सवालही नेटकऱ्याने विचारला.

हेही वाचा – “जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका? तत्काळ माफी मागा नाहीतर…” चित्रा वाघ यांचं विधान!

अन्य एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसला काय झालं आहे? ते स्वतःच स्वतःची धिंड काढत आहेत. स्वतःच्याच जाळ्यात स्वत: फसत चालले आहेत. दोन्ही पानांवरील मुद्दे काय आहेत आणि त्याचा मतितार्थ काय आहे? हे शेंबड पोरगंसुद्धा स्पष्ट करून सांगू शकतो. बाकी तुमचा एल्गार परिषद पॅटर्न यावेळी फसला बरं आव्हाडसाहेब…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतरही अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी आव्हाडांच्या ट्विटवर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. “पूर्ण पान वाचा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका.” “पूर्ण वाचलं असत तर तोंडावर पडायची वेळ आली नसती” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.