मध्य रेल्वेने मुंब्रा, कल्याण, डोंबिवलीसह रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेरुळांशेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस देत सात दिवसांच्या आत घरे रिकामे करण्यास सांगितले आहे. यानंतर स्थानिकांसह खासदार आणि आमदारही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावरुन इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आधीही निवारा हा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन असं म्हटलं आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासलाना इशारा दिला आहे. “रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर १० झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो तर लढाऊ असतो. क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याआधी लोकांची पर्यायी व्यवस्था आधी करा मगच घरं खाली करा, अन्यथा आम्ही त्या लोकांसोबत उभे राहू, असा इशारा दिला होता. “कळव्यात जेव्हा असाच निर्णय झाला होता तेव्हा आम्ही तीन तास रेल्वे रोखून धरत सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडलं होतं. मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा लोकांचा कार्यकर्ता आहे. आम्ही एकाही माणसाला घराबाहेर प़डू देणार नाही. निवारा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन. गरिबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” अशा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. दरम्यान, रेल्वेने रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटीसा दिल्या नंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जागा घ्यायची तर जीवदेखील घ्या अशा शब्दांत सुनावलं आहे. पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असं श्रीकांत शिंदे म्हणाले. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरासह शेलार नाका, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील नागरिकांची श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली होती.