महाराष्ट्रातील अमरावती शहरात हिंसाचारानंतर प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आलीय. इंटरनेटवरील निर्बंध ३ दिवसांसाठी असणार आहे. एकूणच अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद याविषयीचा हा खास आढावा.

शहरात नेमके कोणते निर्बंध?

१२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कलम १४४ लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. ५ किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील.

नेमकं प्रकरण काय?

त्रिपुरात अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबरला निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लीम संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हे हल्ले रोखण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मोर्चातील लोक परत जात असतानाच अमरावतीतील चित्रा चौक, कॉटन बाजार परिसरात ३ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

हेही वाचा : त्रिपुरात नक्की काय घडलंय, ज्यामुळे महाराष्ट्रही अशांत झालाय? वाचा सविस्तर…

या विरोधात भाजपाने १३ नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. मात्र, या बंदला हिंसक वळण लागलं. जमावाने अनेक दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं. यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं. यामुळे अखेर अमरावती प्रशासनाने कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. या प्रकरणात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटक करण्यात आलीय.