ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक वारसा लाभलेल्या महाड नगरीत दि. १० ते १२ जानेवारी २०१४ राजी काळकर्ते शि. म. परांजपे साहित्य नगरीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे १५वे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जयंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन संपन्न होणार असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी महाडमध्ये सांगितले.
    दक्षिण कोकणातील पहिले साहित्य संमेलन महाड नगरीमध्ये आयोजित करण्यात येत असून त्यानिमित्त महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णिक बोलत होते. या प्रसंगी कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर, परिषद कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर, संमेलन समिती प्रमुख रवींद्र आवटी, केंद्रीय कार्यवाह प्रकाश परांजपे, रायगड जिल्हाध्यक्ष व संमेलन प्रमुख सौ. सुनंदा देशमुख, स्वागताध्यक्ष किशोर धारिया, सल्लागार संजय भुस्कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक पुढे म्हणाले, महाड नगरीमध्ये उभारण्यात येणारे साहित्य संमेलन कोकणातील तरुणांना पर्वणी ठरणार आहे. कोकणातील सहा जिल्हय़ांतील साहित्यिक उपस्थित राहाणार असल्याने या संमेलनाला वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले. त्या नंतर स्वागताध्यक्ष किशोर धारिया, डॉ. महेश केळूसकर, रवींद्र  आवटी, संजय भुस्कुटे यांनी संमेलनाची सविस्तर माहिती सांगितली.
    १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होणार असून त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन आणि कलादालन व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर १० वाजता मुख्य उद्घाटन सोहळा सुरू होईल. या समारंभाला जेष्ठ साहित्यिक जयंत पवार, उद्घाटक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भाटकर, विशेष अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, खासदार अनंत गिते, सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर, स्वागताध्यक्ष किशोर धारिया आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
   तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद,  काव्य संमेलनाचे समावेश असणार आहे. यात प्रामुख्याने जागतिकीकरण पश्चात मराठी नवी कविता, तसेच जागतिकीकरणानंतर कथा टिकेल की कादंबरी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. लेखक-कलावंताना राजकीय भूमिका काय असावी, या विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
तर समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून तीर्थरूप आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी उपस्थित राहाणार आहेत. विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. विशेष अतिथी म्हणून विधानपरिषदेचे पक्षनेते विनोद तावडे उपस्थित राहाणार आहेत. तसेच खासदार संजीव नाईक, महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.