पंढरपूर : कार्तिकी वारीला राज्यासह परराज्यातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व विभागाने घ्यावी. तसेच शहरातील अनधिकृत फलक, अतिक्रमणे तत्काळ काढा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी प्रशासन आणि मंदिर समितीने केलेल्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. दरम्यान, कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. पंढरीतील एक महात्त्वाची वारी म्हणून कार्तिकी यात्रेकडे पाहिले जाते. या यात्रेसाठी मुंबई, कोकण, मराठवाडा यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लाखोंच्या संख्येने भाविक येतात.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाने केलेल्या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी काही सूचना संबंधित विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शनरांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे तसेच त्यासाठी जादा स्वच्छता कर्मचारी उपलब्धता ठेवावेत अशी सूचना मंदिर समितीला केली. नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट कायम स्वच्छ राहील याची दक्षता घेऊन नदीपात्रातील खड्डे बुजवावेत तसेच वाळवंट स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक नेमावेत. नदीपात्रात हायमास्ट दिव्यांसाठी जोडण्यात आलेली वीज जोडणी सुरक्षित ठेवण्यासाठी तत्काळ स्थलांतर करावे. शहरातील तसेच प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत, अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी अशा सूचना यावेळी आशीर्वाद यांनी दिल्या.

तसेच चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील भक्तिसागर(६५ एकर), चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये शौचालय, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षाव्यवस्था याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर मंदिर समितीकडून पत्राशेड, दर्शनरांगेत करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दीपक धोत्रे, लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीकडून वारकरी-भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तर कार्तिकी वारीदरम्यान ‘व्हीआयपी’ दर्शन बंद ठेवले आहे. तसेच दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असे शेळके यांनी सांगितले. तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून ६५ एकर, वाळवंट व शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, अतिक्रमण मोहीम, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदींबाबत माहिती दिली. दरम्यान, वारीचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी खड्डे पालिकेने बुजवले नाहीत. या बाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.