रत्नागिरी : खेड तालुक्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. खेड बाजार पेठेत शिरलेले पाणी ओसरल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र खेड येथील जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीच्या वर वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील खेड व दापोली तालुक्याच्या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. खेड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडून अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाचा जोर ओसरल्यावर खेड बाजार पेठेतील पूरस्थिती आटोक्यात आली आहे. पुराचे पाणी कमी झाल्यावर येथील दुकानदारांनी दुकानात व परिसरातील मार्गावर साचलेला चिखल साफ करीत आपली दुकाने सुरु केली.

जगबुडी व नारंगी नदीचे पाणी पातळीत वाढ झाल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. तसेच खेड हून दापोली व मंडणगडकडे जाणारी ठप्प झालेली वाहतूक पुर्ववत सुरु झाली आहे. खेड – बहीरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे खाडीपट्टयाकडे जाणारा बंद झालेला मार्ग सुरु झाला आहे. खेड, दापोली व मंडणगड या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला होता. येथील जनजीवन आता पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही इशारा पातळीच्या वर वहात असल्याने येथे पुराची भीती कायम राहिली आहे. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती दलाच्या तुकड्या कायम स्वरुपी कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण पाऊस ५१६.१३ मिमी तर सरासरी ५७.३४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त मंडणगड तालुक्यात जास्त १४४.७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. खेडमध्ये ११२.५७ मिमी, दापोलीत ७३.२८ मिमी, चिपळूणात ४०.८० मिमी, गुहागरात २३.४० मिमी, संगमेश्वरात ५४.१६ मिमी, रत्नागिरीत ११.६६ मिमी, लांजा येथे २९.८० मिमी तसेच राजापूरात २५.६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.