मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. पोलादपूरजवळील उंबरकोंड येथे लक्झरी बस पलटी झाल्याने हा अपघात झाला. सोमवारी पहाटे एक ते दीडच्या सुमारास ही घटना घडली. जगदंबा ट्रॅव्हल्सची बस मालवण येथून मुंबईच्या दिशेने निघाली होती. पोलादपूरजवळील उंबरकोंड येथे आली असताना एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नाल्यात पलटी झाली. यात बसमधील २० पकी १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बसमधील जखमी प्रवाशांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविले.
जखमींमध्ये कुंदा विवेक नाईक (५०), विवेक सूर्यकांत नाईक (५५), शुभदा पांडुरंग जोशी (५५), शांती अशोक चव्हाण (३४), दिगंबर केशव परब (५०), सुगंधा सुरेश चव्हाण (६०), तृप्ती मोतीराम नेवगी (६३), नीलेश लक्ष्मण मेस्त्री (३०), हेमंत सदानंद पडवळ (१८), वरदावन भूपाळ मीनगांवकर (३०), अविनाश शिवराम धुमाळे (२२), महेश धुलाजी गोसावी (२५), मेघना उल्हास भोसले (६४), सूर्यकांत महादेव नाईक (८०), शिल्पा सुरेश जोशी (७३) या १५ प्रवाशांसह चालक सुरेश काशीराम चव्हाण (६४) याचादेखील समावेश आहे. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत उंबरकोंड आणि दिविल बंधाऱ्याजवळ स्मशानशेड्स बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अपघात होत आहेत. याच परिसरात आतापर्यंत ३ मोठय़ा बसेस पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील हे धोकादायक वळण कमी करण्याची मागणी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luxury bus accident on mumbai goa highway
First published on: 06-10-2015 at 02:12 IST