कराड –  महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, अग्निवीर, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक समाजासह इतरही लोक नाराज आहेत. विकासाच्या मुद्दा सोडून जाती-जाती, समाज-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत लोकांमध्ये चिड निर्माण झाल्याने त्याचा भाजपला  मोठा फटका बसेल अशी टीका काँग्रेसचे प्रदेश  उपाध्यक्ष, माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुजफ्फर हुसेन यांनी रविवारी प्रचारदौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे नेते झकीर पठाण या वेळी उपस्थित होते. हुसेन म्हणाले, सध्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी वातावरण आहे. हे दोन टप्प्यांमधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरून दिसून आले.

भाजपच्या ‘अबकी बार चारसौ पार’चा आकडा आता निम्म्यावर आला आहे. त्यामुळे संयम सुटलेले पंतप्रधान प्रचारसभांमध्ये खालच्या पातळीवर बोलत आहेत, हे कोणालाही आवडलेले नाही. तसेच निवडणूक आयोगाने सांगितलेले मतदानाचे आकडे वाढवून सांगणे हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नसून  हा निवडणूक आयोगाचा अपमान असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.

संपूर्ण राज्यभरात प्रचाराच्या अनुषंगाने फिरताना इंडिया आघाडीला  चांगले वातावरण असल्याचे दिसून येत आहे. सातारा मतदारसंघातही शशिकांत शिंदे यांना पोषक वातावरण असून ते चांगल्या मतांनी निवडून येतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्याचा फायदा नक्कीच शशिकांत शिंदे यांना झाल्याखेरीज राहणार नाही.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> शरद पवार माढ्याचा एकही प्रश्न सोडवू शकले नाहीत-फडणवीस

कराडमधील सभेत पंतप्रधानांनी कर्नाटकातील मुस्लिमांना काँग्रेसने एका रात्रीत ओबीसीचे आरक्षण आणि ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणावर दरोडा टाकल्याची टीका केली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतात. मात्र, त्यांच्या कृतीतून ते दिसून येत नाही. जर काँग्रेसने कर्नाटकात मुस्लिमांना ‘ओबीसी’मधून आरक्षण दिले असेल, तर ते घटनेनुसारच दिले असेल. मात्र, पंतप्रधान डिक्टेटरसारखे वागतात, हे यावरून दिसून येते. सर्वसामान्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. सर्वांना पुढे घेऊन जाणे आपली जबाबदारी आहे. काँग्रेसने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदींनी तर काँग्रेसच्या जाहीरनामाला मुस्लिमांचा जाहीरनामा म्हटले आहे. यावरून समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षात येतो. महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ येथेही भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही. गतखेपेचा ३०३ जागी विजयाचा आकडा भाजपला पुन्हा गाठणे शक्य नसल्याचा दावा मुजफ्फर हुसेन यांनी या वेळी केला.