– देवेंद्र फडणवीस

मी ६ जूनला दिवसभर गडचिरोली दौऱ्यावर होतो. अगदी अबुजमाडच्या जंगलापर्यंतच्या परिसराला भेट दिली. त्या ठिकाणी जाणारा पहिला मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले. रात्रभर गडचिरोलीत मुक्कामही केला. आजवर किमान चार वेळा तरी मी गडचिरोलीत मुक्काम केला. मला विक्रम करायचे नाहीत. पण, ज्या पद्धतीने संविधानविरोधी मानसिकता आपल्या आदिवासींचे शोषण करते आणि त्यांना विकासापासून वंचित ठेवते, ते मात्र थांबवावेच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलमुक्त भारताचे लक्ष्य ठेवले आहे, ते ध्येय गाठणे फार अशक्य नाही.

मात्र, एक बाब लक्षात घ्यावीच लागेल की, बंदूक हाती घेतलेला नक्षलवादी संपविणे सोपे आहे. पण, भारताच्या सर्व सांविधानिक संस्थांवर आक्षेप घेणाऱ्या शहरी नक्षलवादी नामक व्यवस्थेशी आपल्याला अजून दीर्घकाळ लढा द्यावा लागणार आहे. गडचिरोलीतून ७ जूनला सकाळी नागपूरकडे परतताना मला पत्रकारांनी राहुल गांधी यांनी एक लेख लिहिल्याचे निदर्शनास आणून दिले. मी त्यांना म्हणालो, कशावर लिहिला आहे? ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक! खरे तर हा विषय उगाळून आता जुना झाला. निवडणूक आयोगाने तर वेळोवेळी त्याला उत्तरेही दिली. ती उत्तरे न वाचताच त्यांना लेखक होण्याची खुमखुमी आली असेल, तर माझ्या त्यांना शुभेच्छा! पण, त्याचवेळी एक न मागितलेला सल्लाही… एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक सयुक्तिक ठरेल. बाकी या लेखाला अनुल्लेखानेच उत्तर द्यायला हवे. पण, एक तत्त्व आहे, तुम्ही लोकांना ‘कन्व्हीन्स’ करू शकत नसाल, तर त्यांना ‘कन्फ्यूज’ करा. तेच काम राहुल गांधी वारंवार करीत आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती तितक्याच वेळा जनतेपुढे आणणे हेही काम आपल्याला करत राहावे लागेल. अर्थात बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, हा भाग वेगळा.

असो, महाराष्ट्रातील निवडणुकीचा जोवर प्रश्न आहे, तर ही निवडणूक मुळात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नव्हती, तर त्यात आणखी एक घटक होता, तो म्हणजे भारत जोडो अभियान. ‘जोडो’च्या नावाखाली स्थापन झालेले हे ‘तोडो’ अभियान काय करीत होते, तर देशातील सर्व संवैधानिक संस्थांच्या विरोधात जनमानसात गैरसमज निर्माण करणे, पर्यायाने त्यांना देशाविरुद्धच लढण्यास उद्याुक्त करणे. मग ते सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल. या ‘भारत जोडो’मध्ये कोणत्या संघटना होत्या आणि त्यातील किती संघटनांना डॉ. मनमोहनसिंग यांनी २०१२ मध्ये शहरी नक्षलवादाच्या यादीत टाकले होते, यावर अतिशय सविस्तर भाषण मी महाराष्ट्राच्या विधानसभेत १९ डिसेंबर २०२४ रोजी केले होते.

देवेंद्र फडणवीस यांचं भाषण इथे पाहा

राहुल गांधी यांनी ते जरूर ऐकावे, म्हणजे तुमच्या लेखातील पहिल्या टप्प्याचे उत्तर तुम्हाला आपसूकच मिळेल. १९५० पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या २६ पैकी २५ आयुक्त केंद्राने थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही.

दुसरा टप्पा : मतदारवाढीचा!

राहुल गांधींचा दुसरा आक्षेप मतदार संख्यावाढीचा. ज्याला ते बोगस मतदार म्हणतात. ५ वर्षांत ३१ लाख मतदार वाढले हा त्यांचा आक्षेप आहे. पुढे ५ महिन्यांत ४१ लाख वाढले, असेही ते म्हणतात. युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते. या ४०,८१,२२९ मतदारांपैकी २६,४६,६०८ मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या पक्षाच्या विधि, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर ६० पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे. शिवाय जुनाही काही तपशील वाचावा. २०१४ ते २०१९ या काळात ६३ लाख नवीन मतदार, २००९ ते २०१४ या काळात ७५ लाख नवीन मतदार, २००४ ते २००९ या काळात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले आहेत. म्हणजे २०२४ मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजिबात नाही. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारीसुद्धा हवी असेल तर २००४ : लोकसभेपेक्षा विधानसभेत ५ टक्के अधिक. २००९ मध्ये ४ टक्के अधिक, २०१४ मध्ये ३ टक्के अधिक, २०१९ मध्ये १ टक्का अधिक, २०२४ मध्ये ४ टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा २०२४ मध्ये काहीही नवीन घडले असे नाही.

तिसरा टप्पा :

अधिक मतदानाचा !

मतदानाची टक्केवारी अचानक वाढली, हा तर फारच मोठा विनोद आहे. शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली, हे समजून घ्यायचे असेल तर ताशी मतदान समजून घ्यावे लागेल. दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी ५.८३ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे शेवटच्या एक तासात ७.८३ टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत? सायं. ५ ते ६ हीसुद्धा मतदानाची वेळ आहे आणि ६ पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधींना माहिती नाही काय? यावरही एक सविस्तर लेख ‘लोकसत्ता’मध्येच माझ्या कार्यालयाकडून ३ डिसेंबर २०२४ रोजी लिहिण्यात आला होता. तोही वाचला असता, तर कदाचित इतका लेखनप्रपंच राहुल गांधी यांना आज करावा लागला नसता. 

शिवाय, असे काही महाराष्ट्रातच झाले असे नाही. २०२४ च्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सायं. ५ वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी ६०.९६ टक्के इतकी होती, जी दुसऱ्या दिवशी ६६.७१ टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ ५.७५ टक्के इतकी होती. पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का? आधी रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी यायची, आता ती ५ वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते.

चौथा टप्पा : अर्धवटपणाचा

यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ ८५ मतदारसंघात १२ हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. याचाही हिशेब ३ डिसेंबर २०२४ च्या ‘लोकसत्ता’तील लेखात आहे. सायंकाळी ६ नंतर झालेले मतदान हे १७ लाख ७० हजार ८६७ इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, एक लाख ४२७ मतदानकेंद्रांवर प्रतिमिनिट ९७,१०३.३२ इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायं. ६ नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ १८ मिनिटे २३ सेकंद इतका आहे. ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदान टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात १८ टक्के वाढ, जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला, वणीत १३ टक्के वाढ जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला, श्रीरामपूर येथे १२ टक्के वाढ जेथे काँग्रेस जिंकली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवा अर्थहीन मुद्दा

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंबंधी काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच. पण, मुख्य प्रश्न आहे, तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात, यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करीन!