राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीआधी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईची लोकल आणि बस सेवा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवाय, सात दिवस सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याची अफवाही पसरली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तीन मोठे निर्णय जाहीर केले. ते असे…

१. मुंबईची लोकल बंद करणार नाही
बस किंवा लोकल रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. गर्दी न ओसरल्यास आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. जनतेने या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जनतेने अनावश्यक प्रवास टाळला नाही तर मुंबईची लोकल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

२. सरकारी कार्यालये ७ दिवस बंद ठेवण्यात येणार नाहीत
सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुटी देण्यात आलेली नाही. ५० टक्के उपस्थितीबाबत आम्ही विचार करतो आहोत. सरकारी कर्मचारी कमी उपस्थितीत जास्तीत जास्त काम कसं करु शकतील? याबाबत आम्ही विचारविनीमय करतो आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

३. गरजेची नसतील ती दुकानं बंद ठेवा
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतरांनी दुकानं बंद ठेवावीत. त्यामुळे शहरात गर्दी होणार नाही. जी दुकाने आवश्यक आहेत, तीच सुरू ठेवावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.