Maharashtra Government Formation Live Updates : राज्यातील सत्तेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केलं. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर काल सुनावणी झाली असून, आज सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. तर दुसरीकडं आमदारांना एकसंध ठेवून भाजपाला बहुमत चाचणीत पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Blog

Highlights

    21:06 (IST)25 Nov 2019
    सगळ्या आमदारांना देण्यात आली एकजुटीची शपथ

    शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांना एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली. यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीही नावे घेऊन आमदारांनी शपथ घेतली. 

    21:02 (IST)25 Nov 2019
    शरद पवार यांचाही भाजपावर निशाणा

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपावर निशाणा साधला. हे गोवा नाही हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रत तुमची मनमानी चालणार नाही. फोडाफोडीचं राजकारण सहन केलं जाणार नाही असंही शरद पवार म्हणाले. तसंच अजित पवारांना आता कोणतेही अधिकार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

    20:04 (IST)25 Nov 2019
    फोडाफोडीचं राजकारण कराल तेवढे आम्ही एक होऊ

    फोडाफोडीचं राजकारण जे कोणी करत असतील त्यांना खुशाल करुदेत जेवढे ते प्रयत्न कराल तेवढे आम्ही एकत्र होऊ असंही उद्धव ठाकरेंनी म्हणत भाजपाला सुनावलं आहे 

    19:48 (IST)25 Nov 2019
    २३ तारखेला झालेला शपथविधी अल्पमतातला

    २३ तारखेला झालेला शपथविधी हा अल्पमतातला. भाजपाकडे बहुमत नाही. ते फ्लोअर टेस्टमध्ये अपयशी ठरतील. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.  

    19:42 (IST)25 Nov 2019
    उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे एकाच मंचावर

    महाविकास आघाडीचे आमदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.  या ठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे हे तिघे एकाच मंचावर आल्याचं पाहण्यास मिळालं 

    19:24 (IST)25 Nov 2019
    ग्रँड हयातमध्ये घोषणा

    महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा ग्रँड हयातमध्ये देण्यात आल्या. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हेदेखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही १६२ हा नवा नारा महाविकास आघाडीने दिला आहे. सगळ्या आमदारांना एकजुटीची शपथ दिली जाणार आहे 

    19:14 (IST)25 Nov 2019
    आम्ही १६२ महाविकास आघाडीचा नवा नारा

    आम्ही १६२ हा नवा नारा महाविकास आघाडीने दिला आहे. सगळेच आमदार आता ग्रँड हयात या हॉटेलमध्ये जमू लागले आहेत 

    18:54 (IST)25 Nov 2019
    संजय राऊतही ग्रँड हयातमध्ये दाखल

    शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी शिवसेनेची बस दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बसही दाखल झाली आहे. तर काँग्रेसची बस निघाली आहे ती काही वेळातच ग्रँड हयात या ठिकाणी पोहचणार आहे 

    18:53 (IST)25 Nov 2019
    शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये पोहचले

    आम्ही १६२ असं शक्तीप्रदर्शन महाविकास आघाडीच्या आमदारांकडून केलं जातं आहे. यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहचले आहेत 

    17:18 (IST)25 Nov 2019
    १६२ आमदारांची ग्रँड हयातमध्ये बैठक

    महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांची बैठक हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 

    17:17 (IST)25 Nov 2019
    संजय राऊत यांना वेड लागलं आहे, रावसाहेब दानवेंची टीका

    शिवसेना खासदार संजय राऊत यांना सत्तेचं स्वप्न पाहता पाहता वेड लागलं आहे अशीही टीका रावसाहेब दानवेंनी केली 

    16:22 (IST)25 Nov 2019
    अजित पवारांनी बजावलेला व्हीप राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक -रावसाहेब दानवे

    सत्तास्थापनेच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. न्यायालयातील सुनावणी आणि संजय राऊत यांच्या आरोपांना भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलं आहे. "अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी बजावलेला व्हीप पक्षाच्या आमदारांना बंधनकारक असतो. भाजपा पाच वर्ष स्थिर सरकार देईल. संजय राऊतांनी शांत राहावं. तब्येची काळजी घ्यावी," असा सल्ला देत दानवे म्हणाले, "सत्तेची वाट पाहताना संजय राऊत यांनाच वेड लागण्याची वेळ आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असं प्रत्युत्तर त्यांनी राऊत यांना दिलं.

    15:32 (IST)25 Nov 2019
    सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल -छगन भुजबळ

    अजित पवारांची भेट घेतलेल्या छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. छगन भुजबळ म्हणाले, “घर तुटता कामा नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. सकारात्मक मार्ग नक्कीच निघेल, अशी आशा आहे. तसेच समजावून सांगण्याचा उद्देश सफल झालेला नाही,” असं भुजबळ म्हणाले.

    14:38 (IST)25 Nov 2019
    भाजपा कोअर कमिटीची बैठक संपली; दुसरी बैठक चार वाजता

    सत्तास्थापन केल्यानंतर भाजपाकडून बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात चर्चा सुरू असून, पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर भाजपाची पुन्हा दुपारी बैठक होणार आहे. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. 

    13:42 (IST)25 Nov 2019
    आमची बाजू सत्याची, सत्याचा विजय होईल -संजय राऊत

    आमची बाजू सत्याची आहे, आम्ही खरं बोलतोय. सत्याचा विजय होईल. यशवंतरावाचा आज स्मृतिदिन आहे. यशवंतरावांनी लोकशाहीचा सन्मान राखला. पदभार स्वीकारणाऱ्यांनी यशवंतरावांना समजून घ्यावं. समर्थन आहे, म्हणणाऱ्यांनी काळोखात शपथ घेतली आणि पळून गेले.

    13:22 (IST)25 Nov 2019
    काँग्रेसनेच लोकशाहीची हत्या केली आहे -भाजपा

    महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी जनमताचा कौल मिळाला आहे. मात्र, काँग्रेसनं लोकशाहीची हत्या केली आणि उलट आम्हालाच प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचा नैतिक आणि राजकीय विजय झालेला आहे. पण, काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.

    12:38 (IST)25 Nov 2019
    राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांसोबत तासाभरापासून बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अजूनही राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. सकाळी छगन भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर बोलताना ते म्हणाले होते की, प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न सुरू राहतील, असं ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांची विधानभवनात अजित पवारांसोबत तासाभरापासून बैठक सुरू आहेत.

    12:04 (IST)25 Nov 2019
    सत्तेचा तिढा कायम; सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निकाल

    भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. सत्तास्थापनेसंदर्भात राज्यापालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (२६ नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.

    11:48 (IST)25 Nov 2019
    आम्ही हरायला तयार आहोत, पण बहुमत चाचणी घ्या -सिंघवी

    राष्ट्रवादीची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, आम्ही सभागृहात पराभूत व्हायला तयार आहोत. पण, तरीही ते (भाजपा) बहुमत चाचणी घ्यायला तयार नाही, असं सिंघवी म्हणाले. यावेळी त्यांनी १५४ आमदारांच्या सह्यांचं पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. मात्र, या खटल्याची व्याप्ती वाढवणार नसल्याचं सांगत न्यायालयानं ते घेण्यास नकार दिला.

    11:35 (IST)25 Nov 2019
    आमदारांच्या सह्यांचं पत्र दुसरीकडं जोडण्यात आलं -सिंघवी

    राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, 'आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भाजपासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,' अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली आहे.

    11:23 (IST)25 Nov 2019
    "राज्यपाल शिस्तीत काम करत होते, तर एका रात्रीत घाई का केली?"

    शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करण्यास सुरूवात केली आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. सिब्बल म्हणाले, "शपथविधी होण्याच्या पूर्वसंध्येला तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अशी कोणती राष्ट्रीय आपत्ती आली होती की, सकाळी शपथविधी करण्यात आला. ९ नोव्हेंबरपर्यंत शिस्तीत काम करणाऱ्या राज्यपालांनी अचानक एका रात्रीत घाई का केली?, असा सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला.

    11:18 (IST)25 Nov 2019
    अनेक प्रकरणांमध्ये २४ तासांमध्येच बहुमत चाचणी घेण्यात आली -न्यायालय

    सर्वोच्च न्यायालयाच्या सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी सुरू असून, राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता आणि मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले, "अशा प्रकरणांमध्ये न्यायालयानं मागील काही काळात दिलेल्या निर्णयात २४ तासांत बहुमत चाचणी घेण्यात आली आहे. तर काही प्रकरणांमध्ये ४८ तासांचा वेळ देण्यात आला होता," असं खन्ना म्हणाले.

    11:03 (IST)25 Nov 2019
    ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?; न्यायालयाकडून विचारणा

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचं महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती खन्ना यांनी "ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांची स्थिती काय आहे. त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?, असा प्रश्न विचारला. त्यावर रोहतगी म्हणाले, "सध्या आम्हाला निश्चित सांगता येणार नाही. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, बहुमत चाचणीत हे दिसेल, असं रोहतगी यांनी सांगितलं. 

    10:58 (IST)25 Nov 2019
    एक पवार सोबत, तर दुसरे विरोधात आहे -रोहतगी

    भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे," असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं. 

    10:54 (IST)25 Nov 2019
    माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा आहे; मुख्यमंत्र्यांचं पत्रही सादर

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेलं पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आलं आहे. "माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयाला वाचून दाखवलं.

    10:49 (IST)25 Nov 2019
    अजित पवारांनी दिलेलं समर्थनाचं पत्र न्यायालयात सादर

    भाजपानं सरकास स्थापनेचा दावा केला. राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाचं पत्र सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सादर केलं आहे. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. ज्यात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी आणि स्थिर सरकार यावं, यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटल्याचं तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

    10:44 (IST)25 Nov 2019
    निवडणुकीपूर्वीच युतीची कल्पना राज्यपालांना होती -तुषार मेहता

    राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, सरकारच्या वतीनं बाजू मांडतांना तुषार मेहता म्हणाले, निवडणुकीपूर्वीचं युतीची कल्पना राज्यपालांना होती. त्यामुळंच त्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत वाट बघितली. त्याचबरोबर तीन पक्षांनाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

    10:18 (IST)25 Nov 2019
    सत्ता नसेल तर भाजपाचे नेते वेडे होतील -संजय राऊत

    शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपद देण्याची ऑफर भाजपानं दिली असल्याची माहिती मी ऐकली आहे. पण, चंबळच्या डाकूंसारखी भाजपा वागत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरगावमधील हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटका करण्यात आली आहे. बहुमत होतं तर दरोडेखोरी करण्याची गरज काय होती. भाजपाला आम्ही पुरून उरू. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आमचा आकडा त्यांच्यापेक्षा दहाने जास्त असेल," असं म्हणत राऊत म्हणाले, सत्ता गेल्यास भाजपाचे नेते वेडे होतील. पण, आमचं सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना सांगून वेड्याची रूग्णालये सुरू करू," असा टोला राऊत यांनी लगावला.

    09:55 (IST)25 Nov 2019
    राष्ट्रवादीचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही -शरद पवार

    अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेणार असले, तरी पदभार स्वीकारणं हा प्रोटोकॉल आहे. मात्र, भाजपा सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. पक्ष म्हणून आम्ही या सरकारमध्ये आम्ही सामील होणार नाही. बहुमत नसताना भाजपानं सरकार बनवलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार कराड येथे सकाळी पोहोचले. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

    09:24 (IST)25 Nov 2019
    महाविकास आघाडीचे नेते थोड्याच वेळात राज्यपालांना भेटणार

    राज्यातील सत्तासंघर्ष नव्या टोकावर पोहोचला असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं भाजपाला नामोहरम करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडं आपल्याकडे बहुमत असल्याचा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचं भाजपाचं आशिष शेलार सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह तिन्ही पक्षाचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची थोड्यात वेळात राजभवनात भेट घेणार आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांच्या सह्यांचं पत्र देखील देण्यात येणार असल्याचं समजते.

    09:02 (IST)25 Nov 2019
    अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरूच आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना निर्णय मागे घेण्याबद्दल सांगत आहेत. जयंत पाटील यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आज पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. 

    08:54 (IST)25 Nov 2019
    राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा ५२

    राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे. अनिल पाटील आणि दौलत दरोडा हे दोन्ही आमदार बेपत्ता होते. ते दिल्लीत असल्याचे कळल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं. त्यामुळं राष्ट्रवादीचा आमदारांचा आकडा ५२वर पोहोचला आहे. अजून एक आमदार संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

    मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Maharashtra government formation live news updates the supreme court on monday is likely to take a call on the crucial floor test in maharashtra bmh
    First published on: 25-11-2019 at 08:43 IST