Mumbai News Today, 15 June 2023: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जाहिरातींवरून मोठा राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आधी एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त असल्याचा दावा करणारी एक जाहिरात सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावरून देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची चर्चा रंगली. नंतर शिंदे गटानं त्या जाहिरातीशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी दोघांचे फोटो आणि एकत्र लोकप्रियतेची टक्केवारी देणारी जाहिरात प्रसिद्ध केली. यावरून सध्या राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Latest Marathi News Live: महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी वाचा एका क्लिकवर!
गेल्या वर्षी ईडी आणि आयकर विभागाच्या छापासत्रामुळे चर्चेत आलेला आणि वारंवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी नाव जोडले गेलेल्या नंदुरबार तालुक्यातील आयान मल्टिट्रेड साखर कारखान्याला गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर आलेले अजित पवार यांनी गुपचूप भेट दिली.
नाशिक: बालकामगार नसल्याचा अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना गुरूवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
पुणे: आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली.
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर चालकाने विश्रांती घेण्यासाठी उभ्या केलेल्या ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात गस्तपथक पोलिसांना यश आले आहे.
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरली म्हणून २४० कोटी रूपये खर्चाच्या ३८ मेगावाट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची ९२ मीटर उंच चिमणी पाडून टाकण्याची मागणी पुढे आली होती. तर महापालिकेनेही या चिमणीचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून कारवाई हाती घेतली होती.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर, संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवेंसह पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली: अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने बोलावून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोन वृध्द भावांना २५ वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी गुरूवारी सुनावली.
नाशिक: शेतातील घरात मांडणीतून भांडे काढत असतांना साप चावल्याने ३० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रमुख अडथळा मानल्या गेलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी सोलापूर महापालिकेने अखेर पाडून टाकली. शहर व आसपासच्या दोन-तीन तालुक्यांतील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर परिणाम होणाऱ्या या चिमणी पाडकामाचा फटका प्रामुख्याने सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात मुबलक पाणी साठा आहे. तरीदेखील महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असून दुसर्या दिवशी कमी दाबाने पाणी येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून शहरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरी करणारे आरोपी गवारे आणि दनाने हे थेरगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
उल्हासनगर : डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वादाला उल्हासनगर शहरात शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पूर्णविराम दिला आहे.
भंडारा : नाकाडोंगरी येथील एका महिला परीक्षार्थीच्या नवऱ्याला फोन करून कोतवाल भरती परीक्षेच्या निकालात नाव पुढे करून देण्याचे आमिष देणाऱ्या एका एजंटची ऑडिओ क्लिप ‘लोकसत्ता’च्या हाती लागली होती. त्यानंतर वृत्तासह ती चांगलीच प्रसारित झाली. गोबरवाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या एजंटला शोधून काढले. तो एजंट नसून एक भाजीविक्रेता असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
मला काहीही वाटत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं दोघांनाही माहितीये की एकमेकांसोबत राहिल्याशिवाय दोघांची पदं राहणार नाहीत. १५५ आमदार जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहेत, तोपर्यंत त्यांचं सरकार चालणार आहे. त्यामुळे ते कशाला एकमेकांमध्ये अंतर पाडून सत्ता कशाला घालवतील? या सगळ्या चर्चा मीडियामध्येच आहेत - अजित पवार
ज्यांना थोडंही डोकं चालवायचं नाही, असे लोक काहीही बोलतात. शरद पवारांनी कालच सांगितलंय की मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. इतके कमी खासदार घेऊन कुणीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आहे. कुणीही काहीही बोलायला लागलं तर त्यांच्या बोलण्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. कोण मुद्दा उपस्थित करतंय, त्यालाही महत्त्व आहे. त्यांना स्वत:ला पुरंदर मतदारसंघात नाकारलंय. ते नेहमीच असं काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्राची परंपरा आहे की वडिलधाऱ्या व्यक्तीचा आदर करणं. त्यांच्याबद्दल चांगल्या भावनेनं बोलणं. पण या लोकांवर संस्कारच असे झाले असतील, तर काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार? - अजित पवारांचा अमेय खोपकरांच्या वक्तव्यावर टोला
मुंबई: महारेराच्या वसुली आदेशानुसार २० एप्रिल रोजी पनवेल परिसरातील मोरबी ग्रामपंचायतीत एन. के. गार्डनचे भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा यशस्वीपणे लिलाव करण्यात आला होता. या लिलावातून ४.७८ कोटी रुपये मिळाले असून ३४ तक्रारदारांना नुकतीच ही रक्कम अदा करण्यात आली. अदा करण्यात आलेल्या रकमेत ३१ लाख ५७ हजार रुपये इतकी सर्वाधिक वसुली असून सर्वात कमी ३ लाख ४८ हजार रुपये इतकी रक्कम आहे. दरम्यान वसुली रक्कमेसह ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण सहा लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत.
कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांची दहशत वाढल्याने सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुधवारी संध्याकाळी तीन तासाच्या अवधीत दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची मंगळसूत्र दोन भुरट्या चोरांनी लांबवली.
ठाणे महापालिका क्षेत्रात ४३ हजारांच्या आसपास पथदिवे आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, उद्यान तसेच लोकवस्तीत हे पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. या पथदिव्यांसाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही वेळेस खोदकामादरम्यान वाहिन्यांना धक्का लागून त्या अर्धवट तुटतात.
‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुती सरकारमध्ये वादळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या जाहिरातीनंतर भाजपाने शिंदे गटातील नेत्यांना जाहीर इशाराही दिला होता. त्यानंतर, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीने या प्रकरणाचा उत्तरार्ध करण्यात आला. या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका जाहीर केली नव्हती. पालघरमध्ये आज झालेल्या ‘शासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात आज त्यांनी जाहिररीत्या याबाबत भाष्य केलं आहे. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख त्यांनी केला.
‘नीट’च्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गेल्या सहा महिन्यांपासून तो ‘नीट’ची तयारी करीत होता, कमी गुण मिळाल्याने नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भावेश तेजुसिंह राठोड (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. डॉक्टर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून तो नागपुरात मेहनत करीत होता.
जळगाव: अमळनेर येथील दंगल प्रकरणात अटकेत असलेला संशयित माजी नगरसेवकपुत्र अशफाक सलीम शेख (३३, रा. दर्गाअली मोहल्ला, गांधीपुरा, अमळनेर) याचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. अशफाकचा मृत्यू झाल्याची वार्ता अमळनेरमध्ये पोहोचताच तणावपूर्ण वातावरण झाले.
पुणे : पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो ८९६ ग्रॅम चरस पोलिसांनी नष्ट केला. लोहमार्ग पोलिसांनी नष्ट केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सव्वासहा कोटीं रुपये एवढी आहे.
आज राज्य सरकारला लोकांनी पसंत केलंय. पण मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदींना ८४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. देशाचा सन्मान जगभरात पोहोचवण्याचं काम मोदींनी केलं आहे. आत्ताच्या परिस्थितीत अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदींनी केलंय. ते जगात लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत याचा अभिमान आणि आनंद आम्हाला जास्त आहे. खुर्च्या, सत्तेचा मोह कुणाला नाहीये. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कालही, आजही आणि उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. आजही आमचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय. घरात बसून आदेश देणारं, फेसबुक लाईव्ह सरकार नाहीये हे - एकनाथ शिंदे
विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. पण बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींचे विचार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय. यात वर्षभरापूर्वी मिठाचा खडा टाकला होता. पण तो आम्ही उचलून फेकून दिला. त्यामुळे काहीही केलं, तरी आमच्यात दरी निर्माण होऊ शकत नाही. कारण हे सरकार एका विचारांचं सरकार आहे. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची आत्ताची मैत्री नाहीये. गेल्या २० वर्षांपासून ही मैत्री आहे. जीवाभावाची आमची मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नहीं. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी. काही लोक म्हणतात जय-वीरू की जोडी है, काही म्हणतात धरम-वीर की जोडी है.. पण मी सांगेन, ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते, त्यांना या जनतेनंच बाजूला सारलं आहे - एकनाथ शिंदे
नागपूर: अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील ३४० पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे.
जिल्हातील घुग्घुस शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब एका गायीन तोंडात घेतला. या बॉम्बच्या स्फोटामुळे गायीचा जबडा छिन्नविछीन्न झाला होता. मालकाने गायीला मरणासाठी सोडून दिले होते. ही गाय शहरातील मार्गांवर फिरताना काहींना दिसली. तिची अवस्था पाहून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला.
राज्यात गुटखा प्रतिबंधित असला तरी पनवेल व परिसरात पानाच्या गादी आणि टप-यांवर गुटखाविक्री सूरु आहे. नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती कक्षाने पनवेलमध्ये पाळत ठेऊन गुटखा पुरवठा कऱणा-या टेम्पो चालकाला शहरातील बंदररोड येथील वाली गृहनिर्माण संस्थेसमोर २० लाख रुपयांच्या मुद्देमालासह रात्री साडे दहा वाजता पकडले.
पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी सांगितल्यानंतर आता मावळचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पुणे प्रतिनिधी: मागील साडे तीन वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटीहून अधिक नागरिकांना रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य देण्याच काम केले आहे. शेतकर्यांना केंद्राकडून ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार अशी एकूण १२ हजारांची मदत दिली जात आहे. या मदतीमधून शेतकरी कसा उभा राहील. यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. तर दुसर्या बाजूला देशात निश्चित महागाई वाढली असून ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत आहे. अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे केशवप्रसाद मौर्य यांनी मांडली.
आमचा एकत्र प्रवास २५ वर्षांचा आहे. गेल्या वर्षभरात अधिक घट्ट आहे. आमच्या प्रवासाची चिंता कुणीच करण्याचं कारण नाही. कारण आम्ही सरकार खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी तयार केलेलं नाही. सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी तयार केलंय. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू हे सरकार नाहीये. हे जुनं सरकार नाहीये की कुणी आधी भाषण करायचं, कुणी नंतर यासाठी एकमेकांची गचांडी पकडणारे आम्ही बघितले - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Latest Marathi News Live: महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी वाचा एका क्लिकवर!