अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आज ( २६ सप्टेंबर ) जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात ही अटीतटीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनेलचा राष्ट्रवादीने धुव्वा उडवला आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे येऊन सभा घेतली. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांचा पराभव झाला आहे. तर, राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा, ग्रामपंचायत आणि आता कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड यांना पराभवाचा सामना करण्याची नामुष्की ओढावली आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर, कैलास वाकचौरे, अशोकराव भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ – ० असा पिचड यांच्या पॅनेलचा पराभव केला आहे. त्यामुळे जवळपास २८ वर्षे मधुकरराव पिचड यांची एकहाती सत्ता असलेल्या या कारखान्यावर राष्ट्रवादीने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.

हेही वाचा – अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला आदेश देत सांगितलं “लवकरात लवकर…”

“अकोले तालुक्यातील जनतेने पिचड यांचे पॅनल शंभर टक्के नाकारले आहे. हा विजय राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या विचारांचा आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

विधानसभा, ग्रामपंचायत आणि आता कारखानाही ताब्यातून गेला

मधुकर पिचड हे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात दाखल झाले. त्यानंतर पिचड यांना धक्कामागून धक्के बसत आहेत. मुलगा वैभव पिचड यांचा विधानसभा, राजूर ग्रामपंचायत आणि आता २८ वर्ष सत्ता असलेल्या अगस्ती साखर कारखान्यात त्यांना परभवाचा सामना करावा लागला आहे.