राज्यात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याचं चित्र आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शहरी भागांत आठवी ते १२वीपर्यंत, तर ग्रामीण भागांत पाचवी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. तसेच लसीकरण मोहीमही वेगाने सुरु आहे.

राज्यात आज ३,२५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६% एवढे झाले आहे. दुसरीकडे आज राज्यात ३,१८७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आता एकूण ३६,६७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

“धीर सोडू नका”, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन, प्रशासनाला दिले तातडीचे निर्देश!

दुसरीकडे, भारतात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेने मंगळवारी आणखी एका विक्रमाची नोंद केली. आता प्रत्येक चार लाभार्थींपैकी एका भारतीयाचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोविड -१९ लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी, भारतात मंगळवारी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या आता अंदाजे २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, मंगळवारी ५३ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले. ज्यामुळे देशातील लसीकरणाची संख्या एकूण संख्या ८७.५९ कोटी झाली.